‘मी मोदीभक्त, उठसूट होणारे आरोपाला उत्तर देण्यात अर्थ नाही’; मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : मी मोदींचा भक्त आहे, उठसूट होणार्या आरोपाला उत्तर देण्यात अर्थ नाही, मात्र, पोलीस यंत्रणेवर आरोप करणे खासदार विशाल पाटील यांना खूपच महागात पडेल असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार बैठकीत वसंतदादा कारखान्याला कसे कर्ज मिळाले याचे उत्तर द्यावे असे खुले आव्हान दिले.
पोलीस ठाणे लिलावाने विकले जात असून खूनासारख्या गंभीर घटनामध्ये अल्पवयीन मुलाचा सहभाग दाखवून मुख्य संशयितांना सोडले जात असल्याचा आरोप खासदार पाटील यांनी एका शाळकरी मुलाचा खून झाल्यानंतर केला होता. याबाबत पालकमंत्री म्हणाले, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन योग्य पध्दतीने काम करत असताना खासदार पाटील यांच्याकडून आरोप होत असतील तर त्यांच्याही काही बाजू मला उजेडात आणाव्या लागतील, खासदार खूप हुशार आहेत. त्यांच्या कारखान्याला जिल्हा बँकेचे कर्ज कसे मिळाले याचे उत्तर त्यांनी द्यावे, त्यांच्या कामगिरीबद्दल मी जर पत्रकार बैठकीत बोलायला लागलो तर, त्यांना महागात पडेल. सहकार क्षेत्रात त्यांच्यामुळेच अनेक संस्था अडचणीत आल्या, वसंतदादा कारखाना, सूतगिरणी, बँक यांची काय आणि कशामुळे बिकट अवस्था झाली ? आम्ही दूधखुळे नाही, जिल्ह्यात पोलीस, महसूल यंत्रणा योग्य पध्दतीने काम करत आहे. वसंतदादा, मदन पाटील, विष्णुअण्णा पाटील यांनी चांगले काम केले आहे. याबद्दल आक्षेप घ्यायचे कारण नाही, मात्र, खासदारांच्या कारकीर्दीत जे काम झाले ते मला सांगायला त्यांनी भाग पाडू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा – महानिर्मितीच्या १,६०० मेगावॅट महागड्या विजेचे काय होणार? महावितरण माघार घेताच पर्यायी ग्राहकांचा प्रश्न
माजी खासदार संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून त्यांचे नेतृत्व जिल्ह्यात स्थिरावलेले नेतृत्व आहे. काही काळासाठी ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले होते. मात्र, पुन्हा त्यांना माहेरी यावे वाटले यात गैर ते काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
श्रीमती जयश्री पाटील यांना भाजप प्रवेशावेळी वसंतदादा बँकेच्या अडचणी दूर करण्याचा शब्द देण्यात आला होता. बँकेतील अनियमित कर्ज वसुली थांबविण्यात आल्याने तो शब्द पाळला का असे विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, सहकार कायद्यानुसार जेवढी वसुली अपेक्षित होती, त्यानुसार वसुली झाल्यानंतर थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून ते चुकीचे म्हणता येणार नाही.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांनी आरएसएसबाबत केलेले वक्तव्य चुकीचे नाही. आरएसएस देशप्रेम शिकवणारी संघटना असून जर आम्ही कुणाला संघाच्या शाखेत जा असे सांगितले तर त्यात वावगे काय आहे असेही ते म्हणाले. शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटीची विशेष पथकाकडून चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यातील पाळेमुळे निश्चितपणे शोधली जातील आणि गुन्हेगारांना शिक्षा दिली जाईल असेही मंत्री पाटील म्हणाले.





