मिरारोड ते काशीगाव साडेचार किलोमीटरच्या मेट्रो मार्गाची चाचणी यशस्वी

मुंबई : मेट्रोद्वारे महामुंबईला जोडण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातील मिरारोड ते काशीगाव या साडेचार किलोमीटर लांबीच्या मार्गाची चाचणी आज (दि.१४) यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे मिरारोडहून दररोज मुंबईत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता होणार आहे. येत्या जून महिन्यापासून हा मार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
हेही वाचा – सावंतवाडी अर्बन बँकेचे टीजेएसबीमध्ये विलिनीकरण
हा मेट्रोमार्ग तयार व्हावा यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेव्हा या मेट्रो मार्गासाठी प्रयत्न केले गेले, तेव्हा हा मार्ग तयार करणे व्यवहार्य नसल्याचे मत देण्यात आले होते. मात्र, महायुती सरकारने वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन हा मेट्रोमार्ग तयार केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र मेहता, आमदार निरंजन डावखरे, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, मीरा भाईंदर मनपाचे आयुक्त राधामोहन शर्मा, माजी खासदार आनंद परांजपे तसेच एमएमआरडीएचे अधिकारी आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.