एखाद्या गटाचे कोणत्याही पक्षात विलीनीकरणाची तरतूद नाही : शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

Shiv Sena UBT Crisis : “केवळ एखादा पक्षच दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतो; एखाद्या गटाचे कोणत्याही पक्षात विलीनीकरण होण्याबाबत कोणतीही तरतूद नाही,” असे पत्र शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज (दि.१७) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आले, अशी माहिती खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.
शिवसेना (UBT) खासदार अनिल देसाई आणि खासदार संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना पत्र सुपूर्द केले. पक्षातून फुटलेल्या कोणत्याही गटाला थेट मान्यता किंवा विलीनीकरणाची परवानगी देऊ नये, अशी भूमिका ठाकरे गटाने या पत्राद्वारे मांडली आहे.
लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार अनिल देसाई यांनी सांगितले की, “आम्ही लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिले आहे. जर कोणताही गट आमच्या पक्षावर दावा सांगत किंवा वेगळी भूमिका घेऊन त्यांच्याकडे आला, तर त्यांनी सर्वात आधी आम्हाला (मूळ पक्षाला) त्याबाबत अधिकृतपणे कळवावे.”
हेही वाचा – पीएफ खात्यासोबत मिळते तब्बल 7 लाख रुपयांचे मोफत इन्शुरन्स कव्हर, कसा घ्यावा याचा लाभ?
“कायद्यानुसार केवळ एखादा संपूर्ण राजकीय पक्षच दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतो. एखाद्या पक्षातल्या छोट्या किंवा मोठ्या ‘गटाचे’ दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीनीकरण होण्याबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही,” असेही देसाई यांनी सांगितले.
याच भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, “लोकसभा अध्यक्ष हे आपल्या सर्वांसाठीच अत्यंत आदरणीय व्यक्ती आहेत. आम्ही त्यांचा आणि त्यांच्या पदाचा पूर्ण आदर करतो. आमच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी या संपूर्ण प्रकरणात कायदा, नियम आणि राज्यघटनेच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही आम्हाला दिली आहे.”
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत म्हणाले, “मी अध्यक्षांना सांगितले की, अद्याप कोणीही पक्ष सोडत असल्याचे म्हटलेले नाही. जर कोणी त्यांच्याकडे आले, तर राज्यघटनेचे पालन केले जावे. कोणत्याही स्वतंत्र गटाला मान्यता मिळू शकत नाही; केवळ एका पक्षाचे दुसऱ्या पक्षात विलीनीकरण होऊ शकते.”





