‘दुभंगलेले पक्ष एकत्र आल्यास वाईट वाटण्याचे कारण नाही’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल एक मोठं वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत ही अनेकांची इच्छा असल्याचे ते म्हणाले. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
अशातच आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या संकेतांप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा – भारतीय सैन्यदलप्रमुखांना मोदी सरकारकडून फ्री हँड!
पुढे बोलताना दुभंगलेले पक्ष, दोन भाऊ एकत्र आले, तर त्याबाबतही वाईट वाटण्याचे कारण नाही; परंतु याबाबत काही ठोस समोर आल्यावरच सविस्तर प्रतिक्रिया देणे योग्य होईल, असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले असून, सर्वांनी भारतीय लष्कराच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारसोबत असल्याचे जाहीर केले आहे.एकदिलाने एकसंध राहून दहशतवादाचा मुकाबला करून दहशतवाद समूळ संपवला पाहिजे. आपण २६/११ च्या हल्ल्याच्या वेळेस दुभंगलेला समाज पाहिला तसे या वेळी दिसत नाही, हे विशेष महत्त्वाचे आहे, असेही सपकाळ म्हणाले.