ऋषभ पंतनंतर लखनौने आणखी सहा खेळाडूंबद्दल घेतला मोठा निर्णय, IPL 2027 पूर्वी त्यांना…

IPL : नुकताच आयपीएल 2026 चा हंगाम पार पडला. जो हंगाम रॉयल चॅलेंजर्सने जिंकला. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली. अनेक संघानी आयपीएल 2026 मध्ये अतिशय वाईट कामगिरी केलेली पाहायला मिळाली. लखनौ सुपर जायट्ंस आणि मुंबई इंडियन्स यांसारख्या संघाची कामगिरी अतिशय वाईट पाहायला मिळाली. आता पुढील हंगाम सुरु होण्यापूर्वी लखनौच्या संघाने मोठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2027 ची ट्रॉफी जिंकण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे. लखनौने सर्वप्रथम ऋषभ पंतला ट्रेड करून त्याच्या जागी कुलदीप यादवला संघात घेतले. आता आलेल्या वृत्तांनुसार, लखनौ व्यवस्थापनने आपल्या सहा युवा खेळाडूंबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होण्यासाठी संघातील सहा खेळाडूंना ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे पाठवत आहे. साई सुदर्शनसारख्या फलंदाजांना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कर्नाटकचे माजी खेळाडू जी. जयकुमार यांना फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याची योजनाही आखली जात आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, लखनौ सुपर जायंट्सच्या व्यवस्थापनाने आपल्या काही खेळाडूंना ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत हिम्मत सिंग, मुकुल चौधरी, अक्षत रघुवंशी, अब्दुल समद, आयुष बडोनी आणि अर्शिन कुलकर्णी यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू पर्थमध्ये जस्टिन लँगर यांच्या देखरेखीखाली काही काळ प्रशिक्षण घेतील. त्यानंतर, ते चेन्नईमध्ये नवीन प्रशिक्षक जी. जयकुमार यांच्यासोबत प्रशिक्षण घेतील.
हेही वाचा – पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे ॲसिडिटी, पोटफुगी आणि पचनाच्या समस्यांवर नैसर्गिक उपाय
जयकुमारबद्दल बोलायचे झाल्यास, ते केरळचे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी भारतासाठी साई सुदर्शनसारखे फलंदाज घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपल्या कारकिर्दीत ते वेगवान गोलंदाज असले तरी, फलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्यांची मोठी ख्याती आहे. त्यांनी लखनौ सुपर जायंट्ससोबत काम करण्यास होकार दिला असून, ते पुढील हंगामात संघाच्या डगआऊटमध्ये दिसू शकतात. लखनौच्या प्रशिक्षण सेटअपमध्ये आधीपासूनच टॉम मूडी (क्रिकेट संचालक), जस्टिन लँगर (मुख्य प्रशिक्षक) आणि भरत अरुण (गोलंदाजी प्रशिक्षक) यांचा समावेश आहे. आता जयकुमार संघाच्या फलंदाजांना घडवण्याची जबाबदारीही घेऊ शकतात.
लखनौ सुपर जायंट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा संघ 2022 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे, परंतु त्यांना अद्याप एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. केएल राहुल आणि नंतर ऋषभ पंत यांच्या कर्णधारपदाखाली संघाने चांगली कामगिरी केली असली तरी, त्यांना विजेतेपदापर्यंत पोहोचण्यात अपयश आले आहे. आता, 27 कोटी रुपयांना संघात सामील झालेल्या ऋषभ पंतने फ्रँचायझी सोडल्यानंतर, लखनौ सुपर जायंट्स पुढील हंगामासाठी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे.





