श्रीरामपूरला पाणीपुरवठा करणारा तलाव फुटला; १ कोटी लिटर पाणी वाया, टंचाईची भीती

अहिल्यानगरः श्रीरामपूर नगरपालिकेच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असलेला साठवण तलाव क्रमांक-२ पाण्याचा मोठा दबाव निर्माण झाल्याने मध्यरात्री फुटला. पहाटेपर्यंत पाच तासांत सुमारे १ कोटी लिटर पाणी ऐन उन्हाळ्याच्या टंचाई काळात वाया गेले. हे पाणी लगतच्या शेतीत तसेच स्वप्ननगरी वसाहतीत शिरले. रस्त्यावरही पाणीच पाणी झाले होते.
श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १७८ कोटी रुपये खर्चाच्या साठवण तलावाचे खोलीकरण सध्या सुरू आहे. चार महिन्यापूर्वी भराव टाकून तलावाचे दोन भाग करण्यात आले. प्रवरा कालव्याद्वारे तलावात पाणी भरण्यात आले होते. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास भराव खचल्याने दक्षिण बाजूने पाण्याचा लोंढा सुरू झाला व शेतात, वसाहतीत पाणी शिरले.
ही बाब लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पालिकेला माहिती दिली. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता निलेश बकाल यांनी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना माहिती देऊन पाण्याचा लोंढा रोखण्यासाठी जेसीबी उपलब्ध केला परंतु पाण्याचा दाब जास्त असल्याने रात्री पाणी रोखण्यात अपयश आले. सकाळी युद्धपातळीवर यंत्रणा राबवून पाणी बंद करण्यात आले. दरम्यानच्या काळात सुमारे १ कोटी लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे श्रीरामपूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. पिण्याच्या पाण्याचे आवर्तन आता २५ मे दरम्यान सोडण्यात येणार आहे. त्यातही पाऊस झाल्यास आवर्तन लांबण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ‘दुभंगलेले पक्ष एकत्र आल्यास वाईट वाटण्याचे कारण नाही’; हर्षवर्धन सपकाळ
तलावाच्या खोलीकरणाचे काम रात्री १० पर्यंत काम चालते व पहाटे पुन्हा सुरू होते. मात्र काल काम करणारे लवकर घरी गेले होते तसेच इथे रखवालदार वगैरे नसल्याने हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. रात्री खूप उशिरा झाल्याने त्यावेळी काहीच करता आले नाही. खोलीकरणाचे काम करताना संबंधित यंत्रणेने तलावात पाणी भरलेले असल्याने भराव खचला किंवा काय याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची चर्चा शहरात आहे.
श्रीरामपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागते, वॉल नादुरुस्त होतात पण त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते व हजारो लिटर पाणी वाया गेल्यानंतर, नागरिकांनी तक्रार केल्यानंतरच पालिका दखल घेते. मात्र पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी याबाबत निष्क्रिय असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. फुटलेल्या तलावाच्या कामाची चौकशीची मागणी नागरिकांकडून होत आहे.
गोंदवणीच्या सरपंच दिपाली फरगडे, प्रवीण फरगडे यांच्यासह ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याच्या मागणीचे निवेदन पालिका मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना दिले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
जुन्या पाझर तलावाच्या ३४ एकर जागेत नवीन तलाव खोदण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या एका तलावातील पाणी श्रीरामपुर शहराला १८ दिवस पुरू शकते. त्यामुळे या जुन्या तलावातही पाणी साठवणे गरजेचे होते. त्यासाठी पूर्ण तलाव रिकामा करण्याऐवजी अर्ध्या तलावात भराव करुन पाणी साठवले व अर्ध्या भागात काम सुरू होते. परतु, पाझराने १५ दिवसांपासून काम बंद आहे. संपूर्ण तलाव कोरडा करून हे काम केले असते तर दरमहा १० दिवस टंचाईला सामोरे जावे लागले असते. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून निम्म्या तलावात भराव टाकला व निम्म्या तलावाचे खोदकाम सुरू होते. मात्र, दुर्दैवाने हा भराव फुटल्याने शहराचे सुमारे ९० दिवसांचे पाणी वाया गेले. आता कॅनॉलचे आवर्तन येईपर्यत पाणीकपात करावी लागणार आहे. त्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे.
– मच्छिद्र घोलप, मुख्याधिकारी, पालिका.