‘फळपीक म्हटले की महाराष्ट्र’ अशी जगभरात ख्याती जगभरात व्हायला हवी – शरद पवार

मुंबई: महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्राची सद्यस्थिती, दिशा व नव्या संधी या अनुषंगाने आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महाराष्ट्रातील फलोत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील उत्कृष्ट वाण उपलब्ध करणे, राज्यातील फलोत्पादन वाढीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण फळपीक विकसित करुन त्याचं ब्रॅंडिग करणे, वसंतदादा शुगर इन्स्ट्यिट्यूटच्या धर्तीवर फळपीकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था उभी करुन प्रत्येक जिल्ह्यात फळनिहाय शाखा निर्माण करणे अशा आदरणीय खासदार शरद पवारसाहेबांनी केलेल्या विविध सूचनांवर राज्यशासन सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिली.
तसेच महाराष्ट्र फलोत्पादन क्षेत्रात देशात अग्रेसर आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा लौकिक वाढवण्यासाठी या क्षेत्रातील आव्हानांवर तोडगा व नव्या संधी निर्माण करण्यावर भर हवा. ‘फळपीक म्हटले की महाराष्ट्र’ अशी जगभरात ख्याती जगभरात व्हायला हवी, असे मत शरद पवार यांनी बैठकीत मांडले.
बैठकीला कृषीमंत्री ना. दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री ना. संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, पोक्राच्या प्रकल्प संचालक इंद्रा मालो. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्सचे विलास शिंदे आदींसह राज्यातील फलोत्पादन, कृषी निर्यात क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याच्या कृषी, फलोत्पादन विभागातर्फे राज्यातील फलोत्पादनाबाबत सादरीकरण करण्यात आले.





