मान्सूनचा नवा अंदाज, या दिवशी केरळात धडकणार, महाराष्ट्रात कधी येणार?

Maharashtra Monsoon Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरण बदललं आहे. शेतकऱ्यांना मान्सूनचे वेध लागले आहेत. कधी एकदा मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो आणि कधी एकदा आपण पेरणीला सुरुवात करतो, याची शेतकरी वाट पाहात आहेत. दरम्यान, अगोदर मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होऊ शकतो, असे सांगितले जात होते. आता मात्र मान्सूनचे आगमन लांबले आहे. आता मान्सूनच्या आगमनाबाबत मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मान्सून कोणत्याही क्षणी केरळमध्ये धडकू शकतो. तो महाराष्ट्रातही कधी येणार, याबाबत नवा अंदाज समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांत कोणत्याही क्षणी मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. तसेच केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो पुढील आठ ते दहा दिवसांत महाराष्ट्रात येऊ शकतो. आता राज्यात पुढील पाच दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा – महापालिकेत विविध अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभाराचे वाटप
याआधी राज्यात सगळीकडे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी- कोकण किनारपट्टी भागात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी लावली. सकाळपासून अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळाला. जिल्ह्यात पुढचे चार दिवस मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. 6 तारखेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात गेल्या दहा मिनिटांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अकोला जिल्ह्यात पुढील चार दिवस हवामानात बदल होण्याची शक्यता असून 2 जून ते 5 जून दरम्यान काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार या कालावधीत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, तसेच जनावरे झाडाखाली किंवा वीजवाहिन्यांखाली बांधू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तर विजा, वादळी वारे आणि पावसाच्या काळात सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, झाडाखाली उभे राहू नये तसेच मोबाईलचा वापर टाळावा. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.





