‘माझे तिकीट, माझी शान’ उपक्रम सुरू

मुंबई : पश्चिम रेल्वेने ‘माझे तिकीट, माझी शान-विकसित भारतासाठी माझे योगदान’ नावाची १० दिवसीय सखोल सार्वजनिक संपर्क आणि जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा उद्देश प्रवाशांमध्ये जनजागृती करणे, योग्य तिकीट खरेदीस प्रोत्साहन देणे आणि जबाबदार रेल्वे प्रवासाद्वारे राष्ट्र उभारणीमध्ये सार्वजनिक सहभाग मजबूत करणे हा आहे. ही मोहीम २८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये डिजिटल, समाज माध्यम, जाहिरात आणि प्रत्यक्ष संपर्क उपक्रमांच्या माध्यमातून राबवली जात आहे.
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांशी संवाद वाढवण्यासाठी, प्रत्येक विभागातील एका प्रमुख स्थानकावर संवादात्मक स्टॉल्स, स्टँडीज आणि सेल्फी बूथ उभारण्यात आले आहेत. प्रवाशांशी थेट संपर्क साधण्यासाठी पथनाट्ये, प्रवासी सहभाग खेळ आणि संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ही मोहीम पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर विभागांमधील निवडक स्थानकांवर केंद्रित पद्धतीने राबवली जाईल. या उपक्रमामध्ये समाज माध्यमावर मोहीम, चित्रपटगृहांमधील जाहिराती, एसएमएस संदेश, डिजिटल जाहिरात, एफएम रेडिओवरील जाहिराती आणि बाह्य प्रसिद्धी यासह एकात्मिक संपर्क धोरणाचा समावेश आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील चित्रपटगृहांमध्ये ३० सेकंदांची एक ॲनिमेटेड जागरूकता ध्वनिचित्रफीत दाखवण्यात येईल. तर, डिजिटल जीआयएफ क्रिएटिव्ह प्रमुख संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
हेही वाचा – यशवंतरावांचे स्मृतीस्थळअन् कराडशी ॠणानुबंध; अजित पवारांचा यशवंतरावांना श्रद्धांजलीचा शिरस्ता
सर्व प्रवाशांना या मोहिमेत सक्रियपणे सहभागी व्हावे आणि राष्ट्रीय योगदानाचे प्रतीक म्हणून वैध तिकिट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे. ‘माझे तिकीट, माझी शान, विकसित भारतासाठी माझे योगदान’ या मोहिमेचा स्टॉल चर्चगेट येथे उभारण्यात आला आहे. हा स्टॉल ६ फेब्रुवारी, २०२६ पर्यंत असेल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे सांगण्यात आले.
पश्चिम रेल्वेने ‘माझे तिकीट, माझी शान-विकसित भारतासाठी माझे योगदान’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाबाबत अधिक माहिती देण्यासाठी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. तसेच छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने, नियोजित पत्रकार परिषद आणि कार्यक्रम रद्द करण्यात आला.




