मनोज जरांगेंचं उपोषण अखेर मागे, अंतरवलीमध्ये मध्यरात्री १ च्या नंतर काय घडलं?

Manoj Jarange Patil : जालना येथील अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे आंदोलन करण्यासाठी ३० मेच्या सकाळपासूनच बसले होते. दोन दिवस आधी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली होती. उन्हाच्या कडाक्याने तडफडून मेलो तर जबाबदारी सरकारची असेल असा इशाराही त्यांनी दिला होता. ज्यानंतर आता मनोज जरांगेंनी उपोषण आंदोलन मागे घेतलं आहे. मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात चर्चा झाली. अभ्यासकांच्या सूचना सरकारने मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी रात्री १० च्या नंतर मनोज जरांगेंची भेट घेतली. सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी मध्यरात्री १.१५ च्या सुमारास पाणी पिऊन उपोषण आंदोलन मागे घेतलं.
शासन निर्णय काढण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे. तसंच शासन निर्णय न दिल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशाराही मनोज जरांगेंनी दिला. आमच्या मागण्यांवर सरकारने दिलेल्या ड्राफ्टवरून मंगळवारपर्यंत आदेश काढायची तयारी सरकारने दाखवल्याने उपोषण स्थगित केलं आहे, अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली. तसेच सातारा गॅझेटीयर साठी सरकारला एक महिना वेळ द्यायला हरकत नाही. पण तोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र काढण्यात येतील, अशी माहितीही मनोज जरांगेंनी दिली. आता जर थांबले तर आम्ही या दोघांना (राधाकृष्णा विखे पाटील- प्रसाद लाड) जबाबदार धरणार, असा इशाराही मनोज जरांगेंनी यावेळी दिला.
उपोषण स्थगित होण्याआधी काय घडलं?
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर मध्यरात्री १:१५ वाजता पाणी पिऊन स्थगित करण्यात आलं.
३० मे च्या रात्री मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.
सरकारने अभ्यासकांच्या सर्व दुरुस्त्या मान्य केल्यानंतर, रात्री १०:३० वाजता मंत्री विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली.
सरकारच्या ड्राफ्टनुसार येत्या मंगळवारपर्यंत (२ जून) शासन निर्णय (GR) काढण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे हे उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.





