महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट! ३० मार्चपासून वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा

Maharashtra Weather| राज्यात ३० मार्चपासून ढगाळ हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. सोमवारी ३० मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित विदर्भातही हवामानात बदल दिसून येण्याची शक्यता असून येथेही वादळी पावसाचा अंदाज नाकारता येत नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावरून ही माहिती शेअर केली आहे.
सोमवार, ३० मार्चच्या तुलनेत मंगळवारी ३१ मार्च रोजी वादळी पावसाचे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, काही भागांमध्ये अस्थिर हवामान कायम राहू शकते. त्यानंतर बुधवार १ एप्रिल ते शनिवार ४ एप्रिल दरम्यान पुन्हा वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळ हवामान, दुपारनंतर वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा : नोटाबंदीची पहिली माहिती गुजरातला, आता गॅस टंचाईबाबतही तिथेच रांगा; संजय राऊतांचा दावा
दरम्यान, मार्च महिन्याच्या मध्यावर झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा बदलत्या हवामानामुळे शेतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.





