पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय; सर्व स्तरातून होतंय कौतुक

Eknath Shinde : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी नाव विचारत गोळीबार केला, या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील देखील सहा जणांचा समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, दरम्यान हा हल्ला जेव्हा झाला, त्यावेळी आदिल सय्यद हुसेन हा तरुण देखील तिथेच होता, त्याने तेथील पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दहशतवाद्यांनी त्याच्यावर देखील गोळीबार केला. या घटनेत त्याचाही मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर आता आदिल हुसेन याच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.
काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. पर्यटकांना खच्चरवरून ने -आण करणाऱ्या आदिल सय्यद हुसेन याचाही या घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आदिलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्याच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. दहशतवाद्यांनी जेव्हा गोळीबार केला, तेव्हा त्याला आदिलने विरोध केला होता. त्याने दहशतवाद्यांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत त्याचा देखील मृत्यू झाला. त्याच्यावर देखील गोळीबार करण्यात आला. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आदिल हुसेनच्या कुटुंबाशी संवाद साधला, तसेच त्याच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
हेही वाचा – पहलगाम दहशतवादी हल्ला : ‘सरकारने घेतलेल्या निर्णयांना सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला’; शरद पवार
या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत सरकारनं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे, तसेच सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. त्यांना भारत तातडीनं भारत सोडण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. दुसरीकडे भारताच्या या कारवाईने पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे, पाकिस्तानकडून भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानच्या बाजुची वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे.