To The Point : आंदोलनजीवींमुळे पर्यावरण प्रेमींची चळवळ ‘दिशाहीन’?
नदी प्रदूषण, पर्यावरण संवर्धनानावाखाली निव्वळ ‘स्टंटबाजी’

आंदोलनाला जनाधार मिळेना, परिणाम दिसणार कसे?
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडकरांचे श्रद्धास्थान किंबहुना जीवनवाहिनी इंद्रायणी, पवना आणि मुठा नदी वाढत्या प्रदूषणामुळे अक्षरश: आक्रोश करीत आहे. या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी काही जागृत पर्यावरण प्रेमींनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. पण, या आंदोलनामध्ये शहरातील काही आंदोलनजीवींनी घुसखोरी केली असून, त्यामुळे पर्यावरण प्रेमींची ही चळवळ ‘दिशाहीन’ होईल का? अशी भिती व्यक्त केली जात आहे.
नदी सुधार योजनेच्या विरोधात पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड पर्यावरणप्रेमी संस्थांनी एक दिवस लाक्षणिक उपोषण केले. पुण्यात मागील दोन महिन्यांपासून विविध संस्थांकडून आंदोलन केले जात आहे. नदी सुधार प्रकल्प थांबवून नद्यांमधील पाणी स्वच्छ करा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. त्याचा परिणाम होईल, असे चिन्हे आहेत. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पर्यावरण प्रेमींनी भेट घेतली. त्यावर त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार मनपा आयुक्तांनी शहरातील पर्यावरण प्रेमी संस्था, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मात्र, या बैठकीत पर्यावरणप्रेमींचे समाधान झाले नाही. कारण, या बैठकीत काही संधीसाधू घुसले होते. हा प्रकल्प पुढे रेटून नेण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा ‘फेक नॅरेटिव्ह’ तयार करुन पर्यावरण प्रेमींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. कारण, पर्यावरण प्रेमी आणि राज्य सरकार यांच्यात प्रभावी दुवा नाही.
हेही वाचा – पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय; सर्व स्तरातून होतंय कौतुक
पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण प्रेमींच्या आंदोलनाचा दिशा भरकली असून, काही दिवसांपूर्वी, शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पर्यावरण प्रेमींना सोबत घेतले आणि थेट शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवार यांनी आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासनाला सूचना केल्या. त्यानंतर लगेच, शहरातील प्रत्येक आंदोलनामध्ये पुढाकार घेणारे कथित समाजसेवकांनी आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनजीवी कथित समाजसेवकांमुळे शहरातील आमदार, खासदार यांनी पर्यावरण प्रेमींच्या मुद्यांकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे आंदोलनाचा निश्चित परिणाम किती होईल? याची शाश्वती नाही.
दरम्यान, पर्यावरण प्रेमी नागरिकांचा हेतू स्वच्छ असला, तरी चमकोगिरी करणाऱ्या कथित समाजसेवकांपासून पर्यावरण चळवळीला दूर ठेवावे, असा सूर काही कार्यकर्त्यांनी धरला आहे. प्रत्येक आंदोलनात सहभागी होवून विचका करणाऱ्यांच्या सोबत बसून, पर्यावरण प्रेमींनी त्यांची असलेली उदात्त हेतूला राजकीय वळण देवू नये. नदीत उतरून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सामान्य नागरिकांचा प्रतिसाद अपेक्षीत मिळाला नाही. लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यालाही प्रतिसाद नाही. आता आणखी 27 तारखेला पिंपळे निलख येथील आंदोलनातही तीच अवस्था होणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे झटणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी सरकार, प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी यांच्यात सक्षम दुवा असणारा नेता तयार करावा. ‘फेक नॅरेटिव्ह’ची फॅक्टरी असलेल्यांना सोबत घेतले तर, हासिल काहीच होणार नाही. त्यामुळे पर्यावरण प्रेमींच्या मागण्यांना प्रतिसाद आणि प्रभावशाली अंमलबजावणीची साथ हवी असेल, तर पर्यावरण प्रेमींनी संधीसाधूंना बाजूला ठेवावे आणि ही लोकचळवळ उभी करावी…अशी अपेक्षा सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांमधून व्यक्त होत आहे.