लातूरमध्ये डॉ. अर्चना पाटील यांच्या प्रचारात पवन कल्याणचा झंझावात!
मिशन विधानसभा : मराठीत बोलत जिंकली मने, महायुतीची प्रचारात अघाडी

लातूर : लातूर शहर मतदारसंघात साऊथचे सुपरस्टार आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी झंझावाती दौरा केला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारासाठी आलेल्या पवन कल्याण यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशमुखांचा गड मानल्या जाणाऱ्या लातूरमध्ये अमित देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढत असलेल्या अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली.
सभेत त्यांना मराठीतून बोलण्यास सुरुवात करत उपस्थितांचं मन जिंकलं. तसेच मराठी भाषेचा मी सन्मान करतो, त्यामुळे काही चुकलं तर माफी असावी, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. प्रत्येक भाषणात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज याचा गौरव केला. तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला.
हेही वाचा – भोसरीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरुद्ध खासदार अमोल कोल्हे सभांचा जंगी सामना!

पवन कल्याण म्हणाले, मी इथे फक्त मते मागण्यासाठी आलो नाही. ज्या भूमीत अनेक महापुरुषांचा जन्म झाला, ज्या भूमीत अनेक संत जन्मले, ज्या भूमीत महान लोक होऊन गेले त्या भूमीला मी आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे. छत्रपती शिवरायांची जन्मभूमी.. ज्या मातीने आपल्या हक्कासाठी लढायला शिकवले त्या मातीचा आदर करायला आलो आहे. ज्या मातीने स्वराज्य शब्दाला अर्थ दिला त्या मातीचा आदर व्यक्त करायला आलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यस्थळाला आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे.
महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर सनातन धर्माच्या रक्षणासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहेत. अशा स्थितीत काँग्रेसच्या राजवटीत पालघरमध्ये संतांची त्यांची हत्या झाली. अशा प्रकारची सरकारे आपल्याला नको आहेत. संतांचे आणि सनातन धर्माचे रक्षण करणारे सरकार हवे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची हिमालयाप्रमाणे दक्षिण भारताचे रक्षण केले. अनेक आक्रमकांना येण्यापासून रोखले. त्यामुळे दक्षिणेकडील देशात मंदिरे पाडता आली नाहीत. आम्ही देखील कठोर परिश्रमाने देश मिळवला आहे. आता देश वाचवण्याचा निर्णय तुमच्या हातात आहे, असं पवन कल्याण यांनी म्हटलं.





