रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत अजित पवारांचा एआय तंत्रज्ञानावर भर : शरद पवारांशी चार तास चर्चा

सातारा : रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्रातील वंचितांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली असून, आधुनिक युगात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एआय तंत्रज्ञान कसे उपलब्ध करून देता येईल, यावर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री आणि रयत मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अजित पवार यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक साताऱ्यातील शिवाजी कॉलेजच्या एन. डी. पाटील ऑडिटोरियममध्ये पार पडली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीला शरद पवार, दिलीप वळसे पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख आणि कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. शरद पवार आणि अजित पवार चार तास शेजारी बसून अनेक विषयांवर चर्चा करत होते, त्यामुळे ही बैठक प्रसारमाध्यमांसाठीही उत्सुकतेचा विषय ठरली.
हेही वाचा – “आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही इंग्रजी शाळेतील विद्यार्थी फोडा”, गुलाबराव पाटलांचं विधान चर्चेत
बैठकीनंतर शरद पवारांनी प्रसारमाध्यमांना टाळले, पण अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, “मॅनेजिंग कौन्सिलच्या धोरणात्मक विषयांवर सखोल चर्चा झाली. अभिमत विद्यापीठांचे विस्तारीकरण, सक्षमीकरण, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एआय तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासावर भर देण्यात आला. हे तंत्रज्ञान टप्प्याटप्प्याने कसे उपलब्ध करायचे, याबाबत निर्णय घेतले जाणार आहेत.” एकनाथ शिंदे यांच्या निधी वाटपावरील नाराजीबाबत विचारले असता, अजित पवारांनी ते वृत्त फेटाळले. ते म्हणाले, “असे काही नाही. मी आणि शिंदे कॅबिनेट बैठकीत भेटतो, चर्चा होत असते. नाराजी असेल तर त्यांनी थेट भाजपच्या वरिष्ठांशी बोलावे.”
अजित पवारांचे सायंकाळी 4:30 वाजता आगमन झाले, तर शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील सर्किट हाऊसवरून एकाच गाडीतून आले. पोलीस कवायत मैदानावर शरद पवारांची बाळासाहेब पाटील यांनी भेट घेतली. राष्ट्रवादीचे चिटणीस राजकुमार पाटील यांनी शरद पवारांना पेढ्यांचा बॉक्स दिला. त्यावर शरद पवारांनी मिश्किलपणे, “तुमच्या विजयाचे पेढे मिळाले,” असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधले.