कोल्हापूर गुंतवणूक परिषदेत ४१६० कोटींचे सामंजस्य करार, उदय सामंत यांची माहिती

कोल्हापूर : आजच्या गुंतवणूक परिषदेत १४७ उद्योग घटकांचे ४ हजार १६० कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्ह्याची औद्योगिक प्रगती व रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योग संचालनालयामार्फत जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषद येथे झाली. यावेळी मंत्री सामंत बोलत होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.
हेही वाचा – शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज, महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बील कमी होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
मंत्री सामंत म्हणाले, कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी ज्या दिवशी जागा निश्चिती होईल, त्याच दिवशी आयटी पार्कचा शासन निर्णय काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. युवकांना रोजगार निर्मिती करून देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीयीकृत व जिल्हा बँकांबरोबरच यापुढे सहकारी बँकांमधूनही कर्जपुरवठा ग्राह्य धरण्यात येण्याबाबतचा शासन निर्णय येत्या पंधरा दिवसांत काढण्यात येईल.
माजी आमदार सुजित मिणचेकर, पुणे विभागाचे सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, उद्योजक उपस्थित होते.