खारफुटी वाचविण्यासाठी बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानक आराखडय़ात बदल

खारफुटीची जास्तीत जास्त जंगले वाचवण्यासाठी बुलेट ट्रेनच्या ठाण्यातील स्थानकाची रचना बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नॅशनल ‘हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड’ने (एनएचएसआरसीएल) शनिवारी येथे दिली.
बुलेट ट्रेनच्या ठाण्यातील स्थानकाची रचना बदलण्याच्या निर्णयामुळे खारफुटीची २०,९५६ झाडे वाचणार आहेत. जुन्या रचनेत खारफुटीची ५३ हजार झाडे नष्ट होणार होती. परंतु या निर्णयामुळे आता केवळ ३२,०४४ झाडेच नष्ट होतील, असे ‘एनएचएसआरसीएल’ने स्पष्ट केले.
बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या ‘एनएचएसआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी याबाबत एका निवेदनाद्वारे सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘ठाणे स्थानकासाठी वन्यजीव विभाग, वन विभाग आणि सीआरझेड परवानग्या घेण्यात आल्या आहेत. वन खात्याने काही अटींवर परवाना दिला आहे. पर्यावरण मंत्रालयाने खारफुटीच्या भागाची हानी कमी करण्यासाठी स्थानकाची रचना बदलण्याची अट घातली होती. त्यामुळे ठाणे स्थानकाचे ठिकाण न बदलता आम्ही खारफुटीची हानी कमी करणारी स्थानकाचे नवी रचना केली आहे.’
जपानी अभियंत्यांसह या स्थानकाच्या रचनेवर चर्चा करून सुधारणा करण्यात आली. प्रवासी हाताळणी आणि वाहनतळ हे विभाग खारफुटीच्या परिसरातून दुसरीकडे उभारण्यात येतील, असेही खरे यांनी सांगितले.
आधीच्या रचनेत ठाण्यातील १२ हेक्टरवरील खारफुटीला होता, आता केवळ तीन हेक्टरवरील खारफुटी नष्ट होऊ शकते. स्थानकाच्या जुन्या आरखडय़ानुसार खारफुटीच्या ५३ हजार झाडे नष्ट होणार होती. आता ही २१ हजारांनी कमी करून ३२ हजापर्यंत खाली आणली आहे. नष्ट होणाऱ्या खारफुटीच्या बदल्यात एकास पाच या प्रमाणात फेरवनीकरण केले जाणार आहे, असेही ‘एनएचएसआरसीएल’ने स्पष्ट केले. मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्यात येणार आहे.
नव्या आराखडय़ाचे लाभ
- खारफुटीची २०,९५६ झाडे वाचणार
- जुन्या आराखडय़ानुसार खारफुटीची ५३ हजार झाडे नष्ट होणार होती
- स्थानकाच्या नव्या रचनेनुसार खारफुटीची ३२०४४ झाडे कापणार ल्लत्या बदल्यात खारफुटीची एक लाख ६० हजार झाडे लावणार
- एकास पाच या प्रमाणात फेरवनीकरण मोहीम राबवणार





