#Lockdown: रेल्वेची प्रवासी, उपनगरी सेवाही बंद
नवी दिल्ली : करोनाची साथ नियंत्रणात रहावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदीची मुदत ३ मेपर्यंत वाढवल्यानंतर आता रेल्वेची प्रवासी सेवाही बंदच राहणार आहे. ज्या प्रवाशांनी आधीच तिकिटे काढली आहेत त्यांना परतावा दिला जाईल.
रेल्वेने निवेदनात म्हटले आहे की, करोना टाळेबंदीचा कालावधी वाढवण्यात आल्याने भारतीय रेल्वेने सर्व मेल, एक्स्प्रेस गाडय़ा, प्रवासी व उपनगरी गाडय़ा, कोलकाता मेट्रो, कोकण रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मेपर्यंत रेल्वे प्रवासी सेवा बंद राहणार आहे. मालगाडय़ा व पार्सल वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. याशिवाय रेल्वे स्टेशन व बाहेरील परिसरातल्या आरक्षित, अनारक्षित तिकीट विक्री खिडक्या बंद राहणार आहेत. ज्यांनी ऑनलाइन तिकिटे नोंदवली त्यांना तातडीने संपूर्ण परतावा दिला जाईल, पण ज्यांनी तिकीट खिडकीवर जाऊन तिकिटे घेतली त्यांना ३१ जुलैपर्यंत पूर्ण परतावा मिळणार आहे. तर रेल्वेने मालवाहतूक करणाऱ्यांसाठी विविध सेवांचे शुल्क ३ मेपर्यंत माफ केले आहे.