#Lockdown: ऑक्सफर्डसह अन्य विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या, राज्यपालांना याची माहिती जास्त असेल; शरद पवारांचा खोचक टोला
राज्यात कोरोना आणि लॉकडाउनबरोबर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून बरंच वादळ उठलं होतं. राज्य सरकारनं अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यपालांनी परीक्षा घेण्याच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे .
निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी रायगड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर बुधवारी शरद पवारांनी रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या. पाहणी केल्यानंतर माध्यमांशी पवार यांनी संवाद साधला. “नुकसान झालेल्या विभागाची पाहणी केली असता संपूर्ण यंत्रणा सगळ्याच ठिकाणी पोहोचली नाही. त्यामुळे अजूनही प्राथमिक माहिती आपल्याकडे आली असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यात फळबागा, शेती, घरे याची नुकसान झाले आहे. याचे पंचनामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे जे नुकसान झाले आहे त्यात अधिक अर्थसहाय्य करून मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी,” असं पवार म्हणाले.
यावेळी राज्यात सुरू झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षांवरून शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले,”पदवीधरांची परीक्षा न घेण्याच्या विषयाचा विचार केला, तर भारतातील नामांकित विद्यापीठे तसेच जगातील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. देशात जर खाजगी विद्यापीठे परीक्षा रद्द करण्याचा असा निर्णय घेत असतील, तर शासनानं घेतलेला निर्णय आणि त्यात अगदीच चुकीचं कोणी केलं आहे होत असं नाही. त्यामुळे राज्यपाल महोदयांना याची माहिती जास्त असेल असे मला वाटते,” असा टोला शरद पवार यांनी उत्तर देताना लगावला.