#NisargCyclone: शरद पवारांनी कोकणवासीयांना दिला दिलासा
“आंबा, नारळ, सुपारी या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई देताना पुढील ७ – ८ वर्षाचा विचार करून द्यायला हवी,” असं शरद पवार म्हणाले. “बागायती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहे. त्या बागायती जमीनी साफ करायची देखील मोठी अडचण आहे. रोजगार हमीतून फळबाग उत्पादन करण्याची ही योजना पुन्हा लागू केली तर इथला शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल,” असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
“राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उद्याच याबद्दलची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत कोकणवासियांना संकटातून बाहेर काढण्याचा योग्य निर्णय घेतला जाईल. यामध्ये गरज भासल्यास केंद्राकडे जाऊन मदतीची मागणी करू, यासाठी मुख्यमंत्री पुढाकार घेतील. निसर्ग चक्रीवादळाने सगळ्या भागात नुकसान झाले असतानाही इथला माणूस खचून गेला नाही तर पुन्हा कामाला लागला आहे. पर्यटन क्षेत्रात अनेक नुकसान झाले आहे. या क्षेत्राला उभारी देण्याचा विचार केला जाईल,” असा विश्वासही शरद पवार यांनी कोकणवासीयांना दिला.