उमर खालीद आणि शर्जीलला जामीन नाहीच; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली | २०२० च्या ईशान्य दिल्ली दंगलींशी संबंधित कथित मोठ्या कटप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. मात्र, याच प्रकरणातील अन्य पाच आरोपींना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठाने सोमवारी हा निर्णय दिला. न्यायालयाने निरीक्षण नोंदवत सांगितले की, फेब्रुवारी २०२० च्या ईशान्य दिल्ली दंगलीमागील कथित कटामध्ये उमर खालिद आणि शरजील इमाम हे “सहभागाच्या पदानुक्रमात उच्च स्थानावर” होते. त्यामुळे त्यांना जामीन देणे योग्य ठरणार नाही.
हेही वाचा : तुम्हीही चार मुलं जन्माला घाला, कोणी रोखलंय? ओवैसींचा नवनीत राणांना पलटवार
या प्रकरणात उमर खालिद यांच्यावर बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. २०२० च्या दिल्ली दंगलींमध्ये ५३ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो नागरिक जखमी झाले होते. खालिद यांना २०२० मध्ये अटक करण्यात आली असून तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान खालिद यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता की, “दिल्ली दंगलीप्रकरणी ७५१ एफआयआर दाखल आहेत, मात्र खालिद यांच्यावर केवळ एकच एफआयआर आहे. दंगलीच्या काळात ते दिल्लीत उपस्थित नव्हते. तसेच त्यांच्याकडून कोणतीही शस्त्रे, अॅसिड किंवा गुन्हेगारी साहित्य जप्त झालेले नाही.”
याच युक्तिवादाचा पुढे संदर्भ देताना खालिद यांनी, “मी दिल्लीतच नव्हतो, तर मला या प्रकरणाशी कसे जोडले जाऊ शकते?” असा सवाल उपस्थित केला होता.





