तुम्हीही चार मुलं जन्माला घाला, कोणी रोखलंय? ओवैसींचा नवनीत राणांना पलटवार

Asaduddin Owaisi | भाजपा नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांच्या “हिंदूंनी किमान चार मुलं जन्माला घातली पाहिजेत” या वक्तव्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार पलटवार केला आहे. “तुम्हीही चार मुलं जन्माला घाला, तुम्हाला कोणी रोखलंय? मी तर सहा मुलं जन्माला घातली आहेत,” असे प्रत्युत्तर देत ओवैसींनी राणांच्या विधानाची खिल्ली उडवली.
नवनीत राणांनी एका कार्यक्रमात मौलाना सय्यद कादरी यांच्या कुटुंबाचा दाखला देत “४ बायका आणि १९ मुले” असल्याचा उल्लेख केला होता. तसेच “ते लोक मोठ्या संख्येने मुले जन्माला घालत आहेत, तर हिंदूंनी एका मुलावर का समाधान मानावे?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी हिंदूंनी किमान चार मुले जन्माला घालावीत, असे म्हटले होते.
हेही वाचा : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व कोकण कृषी विकास प्रतिष्ठान यांच्यात सामंजस्य करार
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले, तुम्हीही ४ मुलं जन्माला घाला, तुम्हाला कोणी रोखलंय. मी तर सहा मुलं जन्माला घातली. तुम्हीही जन्माला घाला. तुम्हाला कोणी रोखलंय का. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू म्हणतायत की तीनपेक्षा जास्त मुलं जन्माला घाला. असदुद्दीन ओवैसी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू म्हणाले होते, भारताला जर जागतिक महासत्ता बनायचे असेल तर देशातील लोकसंख्या, ज्ञान आणि कौशल्य यांची सांगड आपल्या पारंपरिक मूल्यांशी घालणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे देशातील लोकसंख्येचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक जोडप्याने किमान तीन अपत्ये जन्माला घालावीत.




