‘भारतात सामान्य नागरिक हाच प्रशासनाचा केंद्रबिंदू’; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मत

नवी दिल्ली : भारताने आपल्या विविधतेचे रूपांतर लोकशाहीच्या शक्तीमध्ये केले असून, लोकशाही संस्था आणि प्रक्रियांच्या माध्यमातून विकास कसा साधला जाऊ शकतो, हे जगाला दाखवून दिले आहे. भारतात लोकशाही यशस्वी ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे येथील सामान्य नागरिक हाच प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केले. २८ व्या राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकारी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कोणत्याही भेदभावाशिवाय जनकल्याणाच्या योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत असल्यानेच गेल्या काही वर्षांत देशातील २५ कोटी जनता गरिबीतून बाहेर आली आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या काळात भारताच्या विविधतेमुळे लोकशाही टिकेल की नाही, याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र, भारताने त्या सर्व शंका फोल ठरवत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.विविध क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा पाढा पंतप्रधानांनी वाचुन दाखवला.
या परिषदेला ४२ राष्ट्रकुल देशांतील ६१ सभापती आणि पीठासीन अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रकुल देशांच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ५० टक्के लोकसंख्या भारतात वास्तव्यास आहे. त्यामुळे भारताने नेहमीच आपल्या अनुभवांचा फायदा इतर सदस्य राष्ट्रांना करून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सध्याचे जग मोठ्या परिवर्तनातून जात असताना ग्लोबल साउथने विकासाचे नवे मार्ग शोधण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा उपसभापती हरिवंश,आंतर-संसदीय संघाच्या अध्यक्षा तुलिया अकसन आणि राष्ट्रकुल संसदीय संघाचे अध्यक्ष ख्रिस्तोफर कालिला यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या परिषदेत संसदीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, खासदारांवर सोशल मीडियाचा प्रभाव आणि लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठीच्या नाविन्यपूर्ण धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.




