Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोलंबियाचा यु-टर्न : भारताच्या स्पष्टीकरणानंतर पाकिस्तानबाबतची सहवेदना मागे घेतली

शशी थरूर यांच्या स्पष्टवक्तेपणानंतर कोलंबियाची भूमिका बदलली

Bogota | भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला जागतिक स्तरावर पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात महत्त्वाची घडामोड घडली आहे. कोलंबियाने पाकिस्तानमधील जीवितहानीबाबत व्यक्त केलेली सहवेदना मागे घेतली आहे. याआधी कोलंबियाने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या मृत्यूंबाबत सहवेदना व्यक्त केली होती, ज्यामुळे भारताकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

कॉंग्रेसचे खासदार आणि जागतिक संपर्क मोहिमेसाठी नेमलेल्या बहुपक्षीय प्रतिनिधीमंडळाचे प्रमुख शशी थरूर यांनी गुरुवारी बोगोटामधील पत्रकार परिषदेत कोलंबियाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. “आम्हाला कोलंबियाच्या प्रतिक्रियेमुळे थोडेसे दु:ख झाले. त्यांनी भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानमधील मृत्यूंबाबत सहवेदना व्यक्त केली, परंतु पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील बळींबाबत काहीही बोलले नाही,” असे थरूर म्हणाले.

थरूर पुढे म्हणाले, “दहशतवादी पाठवणारे आणि त्यांना रोखणारे यांच्यात तुलना होऊ शकत नाही. भारत केवळ आत्मरक्षणाचा अधिकार वापरत आहे. यामागे कोणताही गैरसमज असल्यास आम्ही तो दूर करू इच्छितो.”

भारतीय प्रतिनिधीमंडळाने कोलंबियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री रोजा योलांडा विलाविसेन्सिओ यांची भेट घेतल्यानंतर शुक्रवारी एएनआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, “आम्हाला आज समजावून सांगण्यात आलेल्या माहितीवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला आता काश्मीरमधील परिस्थिती आणि घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती मिळाली आहे. यानंतर आम्ही संवाद सुरू ठेवू शकतो.”

हेही वाचा   :  भारताच्या जीडीपी वाढीत घसरण : उत्पादन क्षेत्रातील मंदीनं अर्थव्यवस्थेला झटका 

थरूर यांनी कोलंबियाच्या भूमिकेचे कौतुक करताना सांगितले की, “उपमंत्र्यांनी अत्यंत सौजन्यपूर्णपणे सांगितले की त्यांनी ती वादग्रस्त सहवेदनांची अधिकृत प्रतिक्रिया मागे घेतली आहे. भारताची भूमिका त्यांनी समजून घेतली असून ती त्यांनी मान्य केली आहे, याचे आम्हाला खूप महत्त्व वाटते.”

थरूर यांनी ट्विटरवरूनही याबाबत माहिती दिली, “आजचा दिवस उपमंत्री रोजा योलांडा विलाविसेन्सिओ आणि आशिया-पॅसिफिक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच्या उत्कृष्ट बैठकीने सुरू झाला. ८ मे रोजी कोलंबियाच्या पाकिस्तानबाबतच्या सहवेदनांबद्दल मी भारताची भूमिका स्पष्ट केली. मंत्र्यांनी खात्री दिली की ती प्रतिक्रिया मागे घेण्यात आली आहे आणि आता आमची भूमिका समजून घेतली गेली आहे.”

शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील बहुपक्षीय प्रतिनिधीमंडळाने पनामा व गुयाना नंतर कोलंबियाचा दौरा केला. हा दौरा भारताच्या ‘दहशतवादाला शून्य सहनशीलता’ या धोरणाचा भाग म्हणून केला जात आहे. कोलंबिया दौरा पूर्ण केल्यानंतर हे प्रतिनिधीमंडळ शनिवारपासून ब्राझील आणि अमेरिकेला भेट देणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button