मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची हवा, पुढील मुख्यमंत्री कोण असावा ?
देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नेतृत्व बदलाची कसलीही हालचाल नाही, हे प्रथम लक्षात घ्या, पण भाजपाच्या अंतर्गत जर डोकावले तर नरेंद्र मोदी यांच्या ठिकाणी कोण? हा प्रश्न मात्र चर्चिला जाऊ लागला आहे. तसे झाले तर भाजपामध्ये मोठे फेरफारही होऊ शकतात आणि मग, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? हा नवा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो !
नरेंद्र मोदींच्या मनात काय?
भारताचे जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत दूरदूरपर्यंत त्या पदासाठी दुसऱ्या कोणाच्याही नावाची चर्चा होऊ शकत नाही किंवा ती करण्याची कोणाची हिंमतही नाही! ते एकदा निवृत्त झाले, किंवा त्यांनी तसे संकेत दिले तर मग चर्चा सुरू होईल. कदाचित, त्याआधी मोदी यांनीच पुढील नाव सुचविलेले असेल, त्यांनी भावी पंतप्रधानांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलेली असेल, लवकरच मोदी वयाची ७५ पूर्ण करत आहेत. त्यानंतर ते लगबगीने राजीनामा देतील, असे काहींना वाटत असले तरी असे अजिबात घडणार नाही, हे पण लक्षात ठेवा!
अजून काही वर्षे देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र !
दरम्यान, २०२९ पर्यंत नरेंद्र मोदी हेच त्या पदावर असतील, त्यानंतरच्या यादीत अर्थात् च देवेंद्र फडणवीस हे एकमेव त्या पदाचे दावेदार असतील, असे चित्र भाजपा वाल्यांनी आज तरी रेखाटले आहे. कारण, मोदींच्याच ते तसे मनात आहे, असे संकेत मिळतात. थोडक्यात, २०२८ पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील, फेरफार किंवा फेरबदल केवळ मंत्रिमंडळात होतील, असे सध्या तरी मानायला हरकत नाही!
थोडासा इतिहास पाहा…
प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे ज्यावेळी महाराष्ट्राची सूत्रे सांभाळायचे, त्यावेळी महाराष्ट्रातील अन्य नेते म्हणजे राम नाईक, राम कापसे, धर्मचंद चोरडिया हे त्यांना वारंवार सांगायचे, की शिवसेनेबरोबर युती नको,आपण स्वतंत्र लढू या ! अर्थातच त्यांचे ऐकले गेले नाही आणि त्यातून भाजपाने पायावर कुऱ्हाड मारून घेतली. बाकीचे थोडेसे आमदार अनेकदा म्हणायचे कुबड्या हव्यातच कशाला? पण त्या दोघांनी सल्ले हसण्यावारी नेले आणि केवळ झटक्यात सत्ता मिळविण्याच्या लालसेतून स्वतःचे आणि भाजपाचे मोठे वाटोळे करून घेतले, हे आज लक्षात येत आहे. पण, जी चूक त्यांनी केली, यापुढे भाजपा करेल असे वाटत नाही ! म्हणजे, त्यावेळी युतीची सूत्रे शिवसेनेकडे होती. आता ‘महायुती’ ची सूत्रे भाजपा स्वतःकडे ठेवेल !
हेही वाचा : Tesla Showroom | मुंबईत भारतातील पहिलं टेस्ला शोरूम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
पूर्वीचा फंडा, उगीचच गंडा !
पूर्वीच्या भाजपाची स्ट्रॅटेजी हल्लीच्या नेत्यांना मुळीच मान्य नसणार. त्यावेळी भाजपा हा कमकुवत पक्ष होता आणि आता तो देशातील सर्वात बलशाली पक्ष झालेला आहे हे लक्षात घेऊ या. आजच्या भाजपा वरिष्ठांना म्हणजे त्यात अर्थात नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत आले त्यांना ही समीकरणे मान्य नसणार! वरिष्ठांचे महाराष्ट्राबाबत एकमत असल्याने, कुबड्या घेऊन फार तर राज्यात सत्तेत येण्याची भाजपाची ही शेवटची वेळ होती.
एकनाथ शिंदेंचे पुढे काय?
मग, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काय ? हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. त्यावर उत्तर आहे, की शिंदे आता तसेही भाजपाचेच एक भाग आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः मराठा तरुणांना एकत्र ठेवण्यासाठी एक ‘पवार’ लागतात, त्यासाठी केवळ अजित पवारांना भाजपाबाहेर ठेवून त्यांच्याशी जमवून घेतले जाणार आहे, नक्की नेमके हेच घडणार आहे ! भाजपाचे हे नवे समीकरण एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना विश्वासात घेऊनच खेळले जाईल !
सध्या फक्त आणि फक्त फडणवीस !
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री कोण? भाजपा आणि ‘महायुती’ च्या विरोधी पक्षांचा सध्या तरी काही वर्षे विचार करण्याची गरज नाही, त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सत्तेची स्वप्ने बघण्याचे काम फक्त फडणवीस यांनी बाकी ठेवले आहे! आजच्या तारखेला फडणवीसांनंतर पुढील मुख्यमंत्री कोण? असे विचारले, तर अनेक हात वर येतील, आम्हाला करा आम्हाला करा..असे अनेक म्हणतील! अगदी श्रीकांत भारतीय देखील हात वर करतील.
मराठा का मराठेतर…?
पण, मराठाच हवा हा विचार जर पुढे आला तर एकनाथ शिंदे किंवा रवींद्र चव्हाण आणि मराठेतर हवा असे सांगितले गेले तर देवेंद्र यांची पहिली पसंती त्यांचे लाडके आणि आवडते चंद्रशेखर बावनकुळे हे एकमेव असतील. त्याशिवाय अनेकांना मुख्यमंत्री व्हावेसे वाटते. पण, आशिष शेलार, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन इत्यादीपैकी एक असाही वरिष्ठांचा सूर निघाला, तर त्यांचा तो निर्णय नक्कीच काँग्रेसच्या वळणावर गेलेला असेल! म्हणजे जे इच्छुक आणि उत्सुक असायचे, ज्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असायची, ते बाजूला पडायचे आणि कोपऱ्यात बसून मुसू मुसू रडतांना दिसायचे आणि भलतेच ‘बावळट’ नाव पुढे यायचे.. त्याच बावळटांनी पुढे स्वतःची घरे भरली आणि राज्यातल्या, देशातल्या काँग्रेसची वाट लावली. भाजपामध्ये काँग्रेस पद्धतीचे ‘बावळट’ औषधाला देखील सापडणार नाहीत. पण नवखे नाव एकदम पुढे येईल, असेही घडणार नाही.
चांगले बाजूला, चमचे पुढे..
काँग्रेसमध्ये जे चांगले होते, ते बाजूला पडले आणि जे चमचे होते तेच नेमके मुख्यमंत्री झाले. भाजपाला आपले तसे वाटोळे करवून घ्यायचे नाही. ते सावध असतात आणि चाणाक्ष, चतुर आहेत. भाजपाचा पुढला मुख्यमंत्री कोण आणि का हा प्रश्न सध्या फक्त चर्चेसाठी ठेवायला हरकत नाही.. दिल्ली अबभी बहोत दूर है !





