आजपासून CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू
परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांसाठी काही नियम

महाराष्ट्र : आजपासून सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे काही नियम आहेत. ते नियम विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी वाचणे गरजेचे आहे. यामुळे परीक्षा केंद्रावर कोणतीही अडचण येणार नाही.
दहावीची परीक्षा इंग्रजी (कम्युनिकेशन) आणि इंग्रजी (भाषा आणि साहित्य) या विषयांपासून सुरू होईल, तर बारावीच्या परीक्षेची सुरुवात उद्योजकता पेपरने होईल. ही परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कधी पोहोचावे, परीक्षा हॉलमध्ये काय घेऊन जावे आणि काय नेऊ नये, याची खात्री करून घ्यावी. विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टीं माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.
परीक्षा केंद्रावर प्रवेश किती वाजता देण्यात येईल?
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर कधी प्रवेश मिळणार, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. बोर्डाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोणत्याही विद्यार्थ्याला सकाळी 10 नंतर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे त्यांना वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल.
हेही वाचा – शिवसृष्टीच्या दुसर्या टप्प्याचे शिवजयंतीला लोकार्पण; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
कोणते कपडे घालावे?
विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश परिधान करून परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे, तर खासगी विद्यार्थ्यांना हलके कपडे परिधान करण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नियमित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासोबत शाळेचे ओळखपत्र आणावे लागणार आहे. त्याचबरोबर खासगी विद्यार्थ्यांना आपले प्रवेशपत्र तसेच शासनाने जारी केलेला कोणताही फोटो आयडी सोबत आणावा लागणार आहे.
परीक्षेच्या हॉलमध्ये काय घेऊन जायचे?
सीबीएसईच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निळा/रॉयल ब्लू शाई/बॉलपॉईंट/जेल पेन, रायटिंग पॅड, इरेजर, भूमिती/पेन्सिल बॉक्स, स्केल, पारदर्शक पाऊच आणि पारदर्शक पाण्याची बाटली, अॅनालॉग घड्याळ, मेट्रो कार्ड, बस पास आणि पैसे परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाता येतील.
परीक्षेच्या हॉलमध्ये काय नेऊ नये?
परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुस्तके, कागदाचे तुकडे, इलेक्ट्रॉनिक पेन, स्कॅनर, पेन ड्राइव्ह, कॅल्क्युलेटर, मोबाइल, इयरफोन, मायक्रोफोन, ब्लूटूथ, स्मार्ट घड्याळे, कॅमेरे, पेजर आणि हेल्थ बँड आदी परीक्षा हॉलमध्ये सोबत नेऊ नये, अन्यथा त्यांना परीक्षेतून काढून टाकले जाऊ शकते आणि त्यांना दोन वर्षांसाठी परीक्षेतून बंदीही घातली जाऊ शकते.
ही परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत होणार आहे. त्यामुळे वेळेपूर्वीच परीक्षेच्या ठिकाणी पोहोचा आणि निवांत पेपर सोडवा. ऑल दि बेस्ट !