IPL2020:आज महामुकाबला; मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
दुबई – IPL 2020 RCB vs MI आयपीएलमध्ये आज भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विरुद्ध उपकर्णधार अशी लढत होणार आहे. आजची लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आहे. मुंबई आणि बेंगळुरू या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत आणि दोघांचा एका पराभव तर एकात विजय झाला आहे. मुंबईने पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध पराभव तर नंतर कोलकाताविरुद्ध विजय मिळवला. विराटच्या संघाने प्रथम हैदराबादचा पराभव केला पण नंतर पंजाबने त्यांना मोठा धक्का दिला.
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही भारतीय संघातील सर्वोत्तम खेळाडू आहेत. एक आक्रमक कर्णधार तर दुसरा कॅप्टन कूल होण्याच्या मार्गावर आहे. रोहितने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे तर विराट पहिल्या विजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे.
या दोन्ही संघात आतापर्यंत २७ लढती झाल्या आहेत. त्यापैकी १८ मध्ये मुंबईने तर ९ सामन्यात बेंगळुरूने विजय मिळवला आहे. गेल्या पाच सामन्यांचा विचार केल्यास तेथे देखील मुंबईने ४ विजय मिळवले आहेत.गेल्या वर्षी या दोन्ही संघात झालेल्या अखेरच्या लढतीत मुंबईने ५ विकेटनी विजय मिळवला होता.
या खेळाडूंवर असेल नजर…
१) रोहित शर्मा
२) जसप्रित बुमराह
३) विराट कोहली
४) युजवेंद्र चहल
रोहित पुढे
फलंदाजीचा विचार केल्यास या वर्षीच्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा हा विराट कोहलीपेक्षा दोन पाऊल पुढे आहे. गेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध त्याने धमाकेदार फलंदाजी केली होती. तर कोहलीला आतापर्यंत झालेल्या सामन्यात प्रभाव पाडता आला नाही. RCBचा संघ बऱ्याच प्रमाणात विराटवर अवलंबून आहे. त्याने चांगली बॅटिंग केली नाही तर संघाची ताकद कमी होते.
सलामीची जोडी डोकेदुखी
RCBकडून पहिल्या सामन्यात देवदत्त पडिक्कलने अर्थशतकी केली. पण दुसऱ्या सामन्यात तो अपयशी ठरला. तर ऑरोन फिंच देखील दोन्ही सामन्यात मोठी धावसंख्या करू शकला नाही. या दोघांना चांगली सुरुवात करून देता आली नाही.
गोलंदाजी कमकूवत
विराटला चांगल्या गोलंदाजीची कमतरता जाणवत आहे. डेल स्टेन हे मोठे नाव असेल तरी दोन्ही सामन्यात तो अपयशी ठरला. तर उमेश यादव आणि नवदीप सैनी यांनी पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. संपूर्ण संघ फक्त युजवेंद्र चहलवर अवलंबून असल्याचे चित्र आहे.