भारत-अफगाणिस्तान पहिला टी-२० सामना रद्द होण्याची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज
IND vs AFG | भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारीला मोहालीच्या मैदानावर होणार आहे. मात्र, घसरलेले तापमान आणि दाट धुके पाहता हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. मोहालीत कडाक्याच्या थंडीत सूर्यास्तानंतर सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मोहालीच्या तापमानाबद्दल जर बोलायचे झाले तर, संध्याकाळी किमान तापमान ५ ते ६ अंश राहण्याची शक्यता आहे आणि या वेळी दाट धुके आणि दव पडण्याची शक्यता देखील जास्त आहे. संपूर्ण उत्तर भारत सध्या कडाक्याच्या थंडी आणि दाट धुक्याने वेढलेला आहे. अशा परिस्थितीत येथे सामना खेळवण्याचा बीसीसीआयचा निर्णय सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? माजी मुख्यमंत्र्याचा मोठा दावा
सामन्यादरम्यान दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होईल आणि याचा परिणाम सामन्यावर होण्याची भीतीही अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत, खेळाडू सामना थांबवू शकतात आणि नंतर सामना रद्द देखील होऊ शकतो. कारण, एकदा धुके पडू लागले की ते वाढतच जाईल आणि नंतर सामना सुरू करण्याची परिस्थिती राहणार नाही. यामुळे दोन्ही अंपायर्स आणि सामनाधिकारी काय निर्णय घेतात, यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
पहिल्या टी-२० सामन्यातील हवामान अंदाज
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-२०च्या दिवशी संध्याकाळी येथे खूप थंडी असेल. दिवसाचे कमाल तापमान १४ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहील. या सामन्यात पावसाची शक्यता नाही. पूर्ण ४० षटकांचा सामना अपेक्षित आहे.