उद्धव ठाकरेंच्या टीकेला राहुल नार्वेकरांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले..
मुंबई : शिवसेना आमदार आपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देणार आहेत. निर्णयापूर्वी नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली होती. यावरून राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलं आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले, अपात्र प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार निकाल आज देणार आहोत. हा निकाल कायद्याला धरून असेल. संविधानाच्या तरतुदीचे पालन करून सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत. त्यावरच हा निकाल आधारित असेल. या निकालातून सर्वांना न्याय मिळेल. संविधानाच्या १० व्या परिशिष्टाचे आजवर न झालेले आकलन या निकालाच्या माध्यमातून होणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीवरून टीका केली होती. त्याला राहुल नार्वेकरांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय असते? त्यांना काय काय काम करावे लागते. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांची १५ दिवस किंवा महिन्यातून एकदा भेट होतच असते, याची माहिती त्यांना कदाचित असणे आवश्यक होते. पण त्यांना याविषयाची माहिती घेण्याचा अधिकचा वेळ मिळालेला नसाव, असेच यातून वाटत आहे, असं नार्वेकर म्हणाले.
हेही वाचा – पेट्रोल-डिझेल टँकर चालक संपावर; राज्यात पुन्हा इंधन टंचाईची शक्यता!
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
लवाद ज्यावेळी नेमून दिला जातो तेव्हा विधानसभा अध्यक्ष हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कसे काय जातात? याचा अर्थ न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटले आहेत असं झालं आहे. अशा गोष्टी असताना त्यांच्याकडून काय निकालाची अपेक्षा ठेवणार? जनतेला कल्पना आलीच असेल. आम्ही जनतेच्या न्यायालयात काम करणारे लोक आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.