ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

संजय राऊत ही गेलेली केस

गुलाबराव पाटलांची खोचक टीका

मुंबईः गुजरातच्या दोन चोरांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, अशी टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर केली होती. या टीकेनंतर आता महायुतीकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. यावरूनच शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनीही संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.

काय म्हणाले गुबालराव पाटील?
गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यानच त्यांना संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आलं असता, संजय राऊत ही गेलेली केस आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. नरेंद्र मोदी हे दुर्दैवी पंतप्रधान आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, “हे उद्धव ठाकरेंचं मत आहे. पण लोकांनी निवडून दिलेल्या माणसांच्या बाबतीत असं बोलणं योग्य नाही.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महायुतीच्या एका प्रचार सभेत बोलताना ‘भाजपा काम करो न करो मी काम करेन’, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केले होते. या विधानावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. “प्रचारादरम्यान काही कार्यकर्ते काम करत नाही, असा आरोप होतो. त्यामुळे कोणी काम करो अथवा न करो आम्ही शिवसैनिक काम करणार आहोत, असं माझ्या म्हणण्याचा उद्देश होता”, असे ते म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
रविवारी महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. “गुजरातच्या दोन चोरांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ते शिवसेना संपवू शकले नाहीत, कारण ही बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे”, असे ते म्हणाले होते. तसेच “मोदी आणि शाह या जोडीने शिवसेनेचं धनुष्य घेऊन चोराच्या हातात दिले, मात्र, आम्ही सुद्धा तुमचं कमळ महाराष्ट्रात राहू देणार नाही”, अशी टीकाही त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button