मावळात सुनील शेळकेंनी घेतला ‘‘यु-टर्न’’, श्रीरंग बारणे यांचे ‘टेन्शन’ झालं कमी!
लोकसभा निवडणूक रणसंग्राम : श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे सामना रंगणार!
पुणे : मागील काही महिन्यांपासून मावळात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे नको, अशी टोकाची भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी आता युटर्न घेण्याची तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे, खासदार बारणे यांची उमेदवारी निश्चित झाली असून, दोन दिवसांत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये तसा निर्णय झाल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री ‘‘अजित पवारांनी मावळ लोकसभेत धनुष्यबाण चालवा…’’ असे आदेश दिल्यानतंर बारणेच महायुतीचे उमेदवार असतील असे संकेत दिलेत. आता अजित दादा जे आदेश देतील, त्यांचं पालन आम्ही करू. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेऊ, असे म्हणत शेळकेंनी ‘यु-टर्न’ घेण्याची तयारी दर्शविली आहे.
श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला भाजपसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील विरोध केला होता. मावळची जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी आग्रहाची भूमिका शेळके यांनी घेतली होती. मात्र आंबेगावच्या सभेत अजितदादांनी मावळात धनुष्यबाण चालवा असे आदेश दिल्याने शेळकेंनी मवाळ भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता मावळमधून श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
बारामतीमध्ये शिवतारे, तर मावळात शेळके यांचा ‘समझोता’…
दरम्यान, सुनील शेळके म्हणाले की, आमचे सर्वेसर्वा अजित पवार असून त्यांनी जी भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेसोबत आम्ही ठामपणाने उभे राहणार आहोत. मात्र महायुतीचा धर्म फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाळावा, असे नाही आहे. शिवसेना, भाजप यांनी देखील युतीचा धर्म पाळला पाहिजे. हा धर्म पाळत असतांना वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळून एकत्र काम केलं पाहिजे असेही त्यांनी सांगितले. मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी मी अजूनही प्रयत्न करत आहे. या जागेवर अजूनही दावा सांगत आहे. मात्र जो उमेदवार असेल त्याच्यासाठी प्रामाणिक काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे बारणे यांचं टेन्शन काही प्रमाणात कमी झालं आहे. कारण, बारामती लोकसभा मतदार संघात शेळके यांच्या प्रमाणाचे शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीविरोधात बंड पुकारले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करीत हे बंद शमवले. त्याच धर्तीवर आता सुनील शेळके यांचे बंड थोपवण्यात शिंदे गटाला यश मिळणार आहे. त्याचा फायदा खासदार श्रीरंग बारणे यांना होईल, असे चित्र आहे.