मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंकडे कसं दिलं गेलं; सुषमा अंधारेंनी सांगितले कारण
एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 40 मधील 20 नेते बाजूला जाणार
मुंबई :
महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले तेव्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद कसं दिलं गेलं हा आजही चर्चेचा विषय आहे. याबाबत खुद्द ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. सुषमा अंधारे यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे बोट दाखवलं आहे. त्या सोलापूरमध्ये महाप्रबोधन यात्रेत बोलत होत्या.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नते अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम केले नसते म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी महत्वाची खाती उपमुख्यमंत्र्यांनी स्वता:कडे ठेवली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची खाती स्वता:कडे ठेवली आणि कपडे फाडणारी खाती शिंदे गटातील नेत्यांनी दिली. फडणवीस हा कपटनतीमध्ये एक नंबर माणूस आहे. आता शिंदे गटातील चार मंत्र्यांचा कार्यक्रम लावला आहे. एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या नेत्यांमधील 20 नेते बाजूला काढले जाणार, असा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केला आहे.
सोबतच, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकातील ज्ञानदेवांवर केलेले टीकात्मक लेखन दाखवत प्रश्न उपस्थित केला. जर सावरकरांनी ज्ञानेश्वरांवर टीकात्मक लेखन केले तर मग सावरकरांवर टीका करणार का? श्री श्री रविशंकर आणि इंदूरीकर महाराज यांनी देवांवर केलेली टीका चालते का? असा सवाल करतानाच देवेंद्रजी तुम्हाला चॅलेंज देते. हे सगळे चुकीचे चालले असेल तर मग प्रकाशन समित्या बंद करणार का? तुमच्यात हिंमत असेल तर आंबेडकर आणि फुले खोट बोलत होते हे समोर येवून सांगा. देवेंद्रजी तुम्हाला काय वाटले, तुम्ही वार कराल आणि मी पळून जाईल असे वाटले का? मी चळवळीतील कार्यकर्ती आहे, असंही अंधारे म्हणाल्या.