‘भुजबळांच्या डोक्याचा केसालाही धक्का लागणार नाही’; गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याविरोधात ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. आज इंदापूर येथे ओबीसी एल्गार सभा झाली. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला.
गोपीचंद पडळकर म्हणाले, अंबडमध्ये एकत्रित आलो म्हणून सरकारही तुमच्या बाजूने निर्णय घ्यायला तयार झालं आहे. अजून काही योजनांचे निर्णय यायचे आहेत. मी भुजबळांना विनंती करतो की नागपूरच्या अधिवेशात त्याही सर्व विषयांना न्याय मिळावा असा प्रयत्न आपल्या माध्यमातून झाला पाहिजे. ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे की वज्रमूठ सैल करू नका. राजकारण, जात-पात-धर्म बाजूला ठेवा. सगळे ओबीसी नेते एक व्हा आणि भुजबळांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहा. एखादा नेता इकडे तिकडे गेला तर काही फरक नाही. मी हात जोडून विनंती करतो सर्वांनी ताकदीने उभे राहा.
हेही वाचा – यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर
गावगाड्यातील सर्व लोक एकत्र आले आहेत. आम्हाला अजून जाळायला स्मशानभूमी नाही. जाळायला कोणाच्या स्मशानभूमीत प्रेत नेलं तर तुमच्या स्मशानभूमीत जाळा सांगतात. ज्याच्या नोंदी सापडल्या त्या मराठा समाजातील मुलांना सरसकट दाखले द्यायला सुरूवात केली आहे. पण अजून आमच्या हेडव्याच्या पोराला, तेल्याच्या पोराला, कोळ्या, साळ्या, माळ्याच्या पोराला हातखर, धनगर, रामोजी, मुस्लमान, लिंगायतच्या पोराला अजून दाखले मिळत नाहीत. आमच्या नावावर जमीन नाही, सातबारा नाही. कोणताही कागदपत्र नाही. आम्हाला काही मिळत नाही, अन् इकडे एका बाजूला एका दिवसांत दाखले देताय आणि तिथं चार चार महिने झाले तरी लोक तिथं अर्ज करत आहेत तर त्यांच्याकडे वेगवेगळे पुराव मागत आहेत. हा दुजाभाव कशासाठी? हा दुजाभाव का करताय? म्हणून गावातल्या सर्व ओबीसींनी एकत्र या, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
अंबडची सभा झाल्यानंतर भुजबळांना अनेक धमक्या आल्या. पण भुजबळ साहेबांना कोणी काही करणार नाही. त्यांच्या डोक्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. महाराष्ट्रातील पाच कोटी धनगर समाजाच्या वतीने भुजबळ साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, हा शब्द सर्वंच्या वतीने देतो. आता पाडापाडीची भाषा सुरू झाली. पाडापाडीच्या भाषेवर हेच सांगायचं की, हुकुमत तो वो करते है जिनका लोगोंके दिले मैं राज होता है, वरना मुर्गों के सर पे भी ताज होता है, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.