गोध्रा, शीखविरोधी दंगलीची चौकशी करणारे माजी न्यायमूर्ती नानावटी यांचे निधन
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश गिरीश ठाकुरलाल नानावटी यांचे शनिवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांनी १९८४ची शीख विरोधी दंगल आणि २००२च्या गोध्रा दंगलीची चौकशी केली होती. काल शनिवारी दुपारी १.१५ वाजता गुजरातमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
न्यायमूर्ती नानावटी यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९३५ रोजी झाला होता आणि ११ फेब्रुवारी १९५८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील म्हणून त्यांची नोंदणी झाली. १९ जुलै १९७९ रोजी त्यांची गुजरात उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर १४ डिसेंबर १९९३ रोजी त्यांची ओडिशा उच्च न्यायालयात बदली झाली. नानावटी यांची ३१ जानेवारी १९९४ रोजी ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २८ सप्टेंबर १९९४ रोजी त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ६ मार्च १९९५ रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि १६ फेब्रुवारी २००० रोजी निवृत्त झाले. न्यायमूर्ती नानावटी आणि न्यायमूर्ती अक्षय मेहता यांनी २००२च्या दंगलीचा अंतिम अहवाल गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना २०१४ मध्ये सादर केला होता. गोध्रा दंगलीत १ हजारहून अधिक लोक मारले गेले होते, त्यापैकी बहुतेक अल्पसंख्याक समुदायाचे होते. २००२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी आयोगाची स्थापना केली होती. गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेस ट्रेनच्या दोन बोगी जाळण्यात आल्यानंतर ही दंगल उसळली होती. १९८४च्या शीखविरोधी दंगलीच्या चौकशीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने नानावटी आयोगाची स्थापना केली होती. नानावटी आयोगाचे ते एकमेव सदस्य होते.