पाच वर्षांच्या चिमुरडीला लैंगिक अत्याचारानंतर ठार मारणार तितक्यात…; नगरमध्ये घडली अमानुष घटना
अहमदनगरः घरात कोणी नसल्याचा गैरफायदा उठवत नराधमाने पाच वर्षीय बालिकेला घरातून उचलून शेतात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर कापडाने गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, तोपर्यंत तिची आई बालिकेचा शोध घेत तेथे आली. तिने त्याला पकडले आणि आरडाओरड केली. त्यामुळे चिमुरडीचा जीव वाचला.
राहुरी तालुक्यातील आरडगावमध्ये ही घटना घडली. आरोपी किशोर उर्फ केश्या विजय पवार (रा. आरडगाव, ता. राहुरी) ला पोलिसांनी अटक केली आहे. घरात कोणी नाही हे पाहून आरोपी पवार याने एका पाच वर्षीय बालिकेला घरातून उचलून शेतात नेले. तेथे नारळाच्या झाडाजवळील शेताच्या बांधाजवळ त्याने त्या बालिकेवर अमानुष अत्याचार केला. त्यानंतर आपण पकडले जाऊ नये म्हणून त्या बालिकेचा कापड्यांच्या सहाय्याने गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, मुलगी घरात दिसत नाही म्हणून तिची आई शोध घेत होती. तिला शोधत ती शेतात नारळाच्या झाडावर आली. तेथे आरोपीला तिचा गळा आवळताना पाहिले. धावत जाऊन आईने आरोपी पवार याला पकडून ठेवले आणि आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून त्या मुलीचे वडीलही धावत आले. मात्र, त्यांना येताना पाहून आरोपी पवार याने मुलीच्या आईच्या हाताला झटका मारून सुटका केली आणि पळून गेला. मात्र, त्या मुलीचा जीव वाचला.
याची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, एस. बी. देवरे, निरज बोकील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून गेलेल्या दिशेने शोधाशोध सुरू केली. काही वेळात आरोपी पोलिसांच्या हाती लागला. राहुरी पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने फिर्यद दिली. त्यावरून आरोपी किशोर ऊर्फ केश्या विजय पवार याच्या विरोधात अपहरण, बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.