ताज्या घडामोडीमनोरंजन

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांचा ‘अभंग तुकाराम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा

मुंबई : मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची ‘अभंग गाथा’ याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला आणि जगद्गुरूंच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. तुकोबारायांची ही अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेने लादलेल्या जलदिव्यातून तावून सुलाखून निघाली आणि आजही आपल्या जीवनाचा भक्कम पाय म्हणून उभी आहे. आजही मराठी लोकांच्या वापरात या गाथेतल्या अभंगाची चरणे, म्हणी, वाक्प्रचार या स्वरूपात आपल्याला ऐकू येतात. एकूणात रोजच्या जगण्यात आज 350 वर्षांनंतरही संत तुकाराम आपल्या या अजरामर रचनांमधून वास्तव्य करताना आपल्याला दिसतात. जगद्गुरूंचं हे तत्वज्ञान नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ हा नवा कोरा चित्रपट येत्या 7 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.

संत तुकारामांची अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेतील धर्माच्या ठेकेदारांनी इंद्रायणीत बुडवण्याचा आदेश दिला. तेव्हा संत तुकोबारायांनी हे आव्हान स्वीकारलं आणि गाथा नदीत बुडवल्या. त्यानंतर या गाथा कशा तरल्या? त्यातून काय संदेश दिला गेला? आणि या सगळ्यात संपूर्ण समाजाने संत तुकारामांवरील भक्तीपोटी आणि प्रेमापोटी काय काय त्याग केला? याचं थरारक आणि त्याचवेळेस भावस्पर्शी असं चित्रण ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात करण्यात आलं आहे.

हेही वाचा    :     सामाजिक विषमता दूर करण्याची जबाबदारी युवा पिढीवर; डॉ. वंदना बोकील

या चित्रपटाचं मोशन टीझर पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. त्यात पाण्याच्या तरंगांबरोबर वर जाणारे अभंगांचे कागद दिसतात. त्याबरोबर आपल्याला पाठमोरे संत तुकोबाराय दिसत आहेत. ज्यांनी आकाशाकडे हात पसरून साद घातलेली दिसत आहे. त्यांच्या समोरून उगवणारा सूर्य हा आशेचे किरण पसरवीत आहे. त्याचवेळी “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” ही तुकोबारायांची अमर रचना अत्यन्त सुमधुर स्वरात समूहाकडून ऐकू येत आहे. त्या तालावर ‘अभंग तुकाराम’ हे चित्रपटाचं नाव भव्य स्वरूपात आकाशात आकाराला येऊन संत तुकारामांचे आणि त्यांच्या रचनांचं अभंगत्व अधोरेखित करताना दिसत आहे.

अत्यंत सुंदर अशा तांत्रिक सफाईने सादर केलेलं चित्रपटाचं हे शीर्षक रसिकांच्या कुतूहलाचा आणि भावपूर्ण आतुरतेचा विषय बनलं आहे. या चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून आपला वारकरी संप्रदायाचा अभ्यास सिद्ध केलेले दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल 10 अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाचे अप्रतिम संगीत निर्माण करणारे प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button