राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक, महाराष्ट्रातील ‘या’ ६ जागांवर निवडणूक
मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी असणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ६ जागांवर निवडणूक होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांच्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जाहीर होणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल. १६ फेब्रुवारीला उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया होईल. तसंच, २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घऊ शकतील. तर, २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर, २७ तारखेलाच मतमोजणी होईल.
हेही वाचा – बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा ‘शैतान’ चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
१३ राज्यातील जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
राज्यसभेतील महाराष्ट्राच्या एकूण ६ सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपत आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, परराष्ट्र मंत्री व्ही. मुरलीधरन, ठाकरे गटाचे अनिल देसाई, काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण या खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे.