पंकजा मुंडे राज्यसभेत जाणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..
मुंबई | २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. एकूण ५६ जागांसाठी मतदान होणार असून यापैकी सहा जागा महाराष्ट्रातील आहेत. विशेष म्हणजे यातील पाच जागा महायुतीच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जात. या पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची ६ फेब्रुवारी रोजी सागर बंगल्यावर भेट झाली. या भेटीमुळे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेतले जाणार का? या चर्चांना उधाण आले होते. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे आणि माझी संघटनेच्या विषयानिमित्त नेहमीच भेट होत असते. पण आमच्या भेटीत राज्यसभेच्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. राज्यसभेत कोण जाणार? याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेत असतात. पंकजा मुंडे या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचे की आणखी कोणते पद द्यायचे हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल, असं ते म्हणाले.
हेही वाचा – ‘दुसऱ्या आयतोबांना ‘राष्ट्रवादी’ मिळाली’; राऊतांचा घणाघात
भाजपकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांचे नावं आहेत. त्यामुळे या नऊ नेत्यांपैकी कोणाच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची माळ पडणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
महाराष्ट्रातील कार्यकाळ संपणारे सहा खासदार कोण?
- प्रकाश जावडेकर (भाजपा)
- व्ही. मुरलीधरन (भाजपा)
- नारायण राणे (भाजपा)
- अनिल देसाई (शिवसेना उबाठा)
- वंदना चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
- कुमार केतकर (काँग्रेस)