‘लोकसभेला भाजपा २६, तर शिवसेना आणि अजित पवार गट..’; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
मुंबई : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. यामध्ये भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्ष आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करत आहे. नेतृत्वात बदल होणारे वृत्त खोटे आहे. तसेच, मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. नागपूर येथील पारंपारिक विधानसभा मतदारसंघ निवडणुकीला उभे राहणार.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. भाजपा २६, तर शिवसेना ( शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) २२ जागा लढविणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुती ४० ते ४२ जागांवर विजयी होईल. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – डुडूळगाव परिसरातील पाणीपुरवठा होणार सक्षम!
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा सर्व्हे करण्यात आला आहे. आमच्याकडे विजयी होणाऱ्या उमेदवारांची माहिती प्राप्त झाली आहे. २०१९ साली निवडून आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी देणं ही परंपरा आहे. पण, हा अंतिम शब्द नाही. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विविध स्तरांवर चर्चा केली जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात होईल. अधिवेशनानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचा आमचा विचार आहे. एखाद्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार निवडणूक लढत असेल, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचा उमेदवार असल्यासारखं प्रचार करतील. हाच नियम शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबतही लागू होईल.