मला कारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरून हटवले ः सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली खदखद
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी।
काँग्रेस आणि त्यातील राजकारणाबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे कायम विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. सोलापुरातील एका कार्यक्रमात देखील त्यांनी असेच एक वक्तव्य केले. आपण मुख्यमंत्री असताना कारस्थान करून मला मुख्यमंत्रीपदावरून हटविले. पण त्यानंतर ते जे पराभूत झाले ते अजूनही जिंकलेले नाही, असे सांगत सुशीलकुमार यांनी मनातील खदखद व्यक्त केली.
काँग्रेसमध्ये आता पूर्वीसारखी वैचारिक शिबिरे होत नाहीत, असे सांगतानाच माझ्या शब्दाला आधी काँग्रेसमध्ये किंमत होती. ती आता आहे की नाही, हे पाहावे लागेल, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वर्षभरापूर्वी केले होते. तर, काही चुकांमुळे काँग्रेस कमकुवत झाली असून आत्मचिंतन करण्याचा सल्ला त्यांनी चार-पाच महिन्यांपूर्वी दिला होता. त्यापाठोपाठ पक्षांतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणावर त्यांनी आता बोट ठेवले आहे.
निवडणूक जिंकून मी मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालो. पण कटकारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्यात आले आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल केले. पण मी पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळविले. पण माझ्याविरोधात कारस्थान करणारे तेव्हा जे पराभूत झाले ते आजपर्यंत पराभूतच आहेत, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. 2004मध्ये केंद्रात यूपीएचे सरकार आल्यानंतर त्यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनविण्यात आले होते. पण लगेचच काँग्रेसने त्यांना 2006मध्ये राज्यसभेवर पाठविले आणि केंद्रीय मंत्री केले. 2012मध्ये केंद्रीय गृहमंत्रीपद देखील त्यांनी भूषविले.
…म्हणून गुजराती समाजाला आरक्षण
मुख्यमंत्रीपदावर असताना गुजराती समाजासाठी एक चांगले काम केले होते. या समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते. एका गुजराती साधूंनी मला बोलावून आशीर्वादही दिला होता. पण कालपरत्वे लोक आता विसरून गेले की, सुशीलकुमारांनी हे आरक्षण दिले. माझा जावई गुजराती असल्याने मी हे आरक्षण दिले. जावयाची काळजी घेण्यासाठी एवढे करावे लागतेच हे तुम्हाला माहीत आहे, असे सुशीलकुमार शिंदे मिश्किलपणे म्हणाले.