‘बजरंग दलावर बंदी घालण्याची कोणाच्या बापाची हिंमत नाही’; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल
मुंबई : काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास बजरंग दल आणी पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालू असं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ते बेळगावात प्राचर सभेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसचे नेते आता मुख्यमंत्री झाल्यासारखे वागायला लागले आहेत. प्रत्येकाला वाटतं की आपण मुख्यमंत्री आहोत. काँग्रेसच्या नेत्यांकडून विविध समाजाचा अपमान केला जातो. आता तर यांची मजल इथपर्यंत पोहोचली की ते आता बजरंग दलावर बंदी घालण्याची भाषा करत आहेत. मात्र, बजरंग दलावर बंदी घालायची कोणाच्या बापाची हिंमत नाही.
काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची हिंमत केली होती. मात्र, त्यानंतर त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं होतं. मुळात काँग्रेस कर्नाटकमध्ये सत्तेत येणार नाही. मात्र, या निर्णयातून काँग्रेसचा उद्देश दिसून येतो. असे निर्णय घेऊन काँग्रेस नेमकं कुणाचं लांगुलचालन करत आहेत? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
या देशात कुणी बजरंग दलावर बंदी घालण्याच्या गोष्टी करत असेल तर त्यांना आता बजरंगाची ताकद दाखवावीच लागेल. या देशात जर कुणी बजरंगबली आणि प्रभू रामाला विरोधात करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवावीच लागेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.