Cyclone Tauktae : पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक
नवी दिल्ली – अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर ‘तौक्ते’ चक्रीवादळात झाले आहे. सध्या हे वादळ लक्षद्वीप बेटांच्या परिसरातून पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने सरकू लागले असून तामिळनाडू आणि केरळ या राज्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय जल आयोगाने यासंदर्भात दोन्ही राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील किनारी भागातील स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वादळाला सामोरे जाण्यासाठी संबंधित राज्य आणि केंद्रीय मंत्रालय व संस्थांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, ‘कॅबिनेट सचिव हे किनारपट्टीतील राज्य, केंद्रीय मंत्रालय आणि संबंधित यंत्रणांच्या मुख्य सचिवांशी सतत संपर्कात राहतील. केंद्रीय गृहमंत्रालय २४ तास परिस्थितीचा आढावा घेत आहे व राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि संबंधित केंद्रीय संस्थांच्या संपर्कात आहे’, अशी चर्चा झाली. तसेच ‘सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यासाठी योग्य ती प्रत्येक व्यवस्था केली जावी. नागरिकांना वीज, आरोग्य, पिण्याचे पाणी यासारख्या मूलभूत सुविधादेखील मिळत राहातील, याची देखील सुनिश्चिती केली जावी’, असे आदेश यावेळी पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना दिले. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळ संभाव्य मार्गाने गुजरातच्या दिशेने जात असताना १५ ते १७ मे दरम्यान ते महाराष्ट्र किनारपट्टीला समांतर जाणार आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, लक्षद्वीप, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात या चक्रीवादळाचा कमी-अधिक प्रमाणात प्रभाव जाणवू शकतो. त्यामुळे चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आणि तात्काळ मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या ५३ तुकड्या सज्ज आहेत. यापैकी २४ तुकड्यांना आधीच संभाव्य प्रभावित क्षेत्रांमध्ये पाठवण्यात आले आहे. तर उरलेल्या २९ तुकड्या ऐन वेळी ५ सर्वाधिक धोका असणाऱ्या राज्यांमध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.