राज्यावर पुन्हा अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात काही ठिकाणी येत्या गुरुवारी, २१ एप्रिल रोजी आणि शुक्रवारी, २२ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवार, २२ एप्रिल रोजी रायगडमध्ये हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह सरींची शक्यता आहे. मात्र पालघर, ठाणे, मुंबई येथे कोरडे वातावरण असेल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
गुरुवारी कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी अहमदनगर आणि पुणे येथे मेघगर्जनेसह पाऊस पडेल. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया येथे शुक्रवारीही मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.