#Covid-19: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा टप्पा 56 लाखाच्या पार; 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर
पुणे: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आज (23 सप्टेंबर) 56 लाखांच्या पार गेला आहे. यामध्ये मागील 24 तासांमध्ये 83,347 नव्या रूग्णांची भर पडली आहे तर 1085 मृत्यू झाले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. सध्या देशात कोविड 19 ची लागण झालेल्यांची एकूण संख्या 5,646,011 पर्यंत पोहचली आहे तर 9,68,377 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
मागील सहा महिन्यात आत्तापर्यंत 45,87,614 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 90,020 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. आज आयसीएमआरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात 6,62,79,462 सॅम्पलसची 22 सप्टेंबरपर्यंत तपासणी झाली आहे. तर काल एका दिवसात 9,53,683 सॅम्पल कोविड 19 साठी तपासण्यात आले आहेत. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. राज्यात दिवसागणिक 15 हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नियमित वाढ होत आहे.
मुंबई,पुणे या जिल्ह्यांसोबत आता महाराष्ट्रात ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. दरम्यान कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान सुरू केले आहे. यामध्ये आरोग्य सेवक घराघरामध्ये जाऊन या आजारा दरम्यान खबरदारी घेण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली आणि पंजाब. या 7 राज्य/केंद्रशासित प्रदेशांचा 63% पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी 65.5% आणि एकूण मृत्यूंपैकी 77% रुग्ण देखील या राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्लीमध्ये 2.0% पेक्षा जास्त मृत्यु दर (सीएफआर) आहे.