#CoronaVirus: राज्यातील 34 कोरोनाबाधित रुग्ण बरे, रुग्णालयातून दिला डिस्चार्ज
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीत बरे होत असल्याचंही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील ३४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये मुंबईतील १४ रुग्ण, पुण्यातील १५, नागपूरमधील १, औरंगाबाद १, यवतमाळमधील ३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १९६ वर गेली आहे.
कोरोनाची लागण झालेले सुरुवातीचे रुग्ण ठणठणीत झाल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने सध्याची वेळ महत्त्वाची असून नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नका अशी विनंती केली आहे.
दरम्यान, राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा हा १९६ वर गेला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात १०७ रुग्ण, पुणे ३७, नागपूर १३, अहमदनगर ३, रत्नागिरी १, औरंगाबाद १, यवतमाळ ३, मिरज २५, सातारा २, सिंधुदूर्ग १, कोल्हापूर १, जळगाव १ आणि बुलढाणा १ अशी रुग्णांची संख्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी सांगितले. मिरजमधील २५ रुग्ण हे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील असल्याचे सांगण्यात येते.