छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य.
संभाजी ब्रिगेडकडून राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.
पिंपरी | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय तथा सामाजिक वातावरण तापलं आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावरून विविध राजकीय तथा सामाजिक संघटनांकडून आक्रमक भूमिका घेत विविध ठिकाणी निदर्शने केली जात आहेत. अशातच आज संभाजी ब्रिगेडने राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कुणी विचारले असते’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं.त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेत थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी मानव कांबळे म्हणाले, राज्यपालांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून समस्त महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने हटवावे, अशी मागणी करण्यात आली. राज्यपाल कोश्यारी सतत या-ना त्या कारणाने चर्चेत आणि विशेषतः वादात असतात.यावेळी मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण राणवडे, छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर-पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे जिल्हाध्यक्षा सुनिता शिंदे, अपना वतनच्या राजश्री शिरवळकर, एम आय एम पक्षाच्या रुहिनाज शेख, बारा बलुतेदार महासंघाचे विशाल जाधव, गाथा परिवाराचे निरंजन सोखी, बी एस पी चे राजेंद्र पवार, तसेच शहाबुद्दीन शेख यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, संभाजी ब्रिगेडचे मावळ तालुकाध्यक्ष आदिनाथ मालपोटे, शहर कार्याध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष नितीन जाधव, महेश कांबळे, संघटक विनोद घोडके, राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब वाघमारे, जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्ष स्मिता म्हसकर, अपना वतन संघटनेचे हमीद शेख,सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार,राम चिंताले, महेश गवस, दत्ता भालेराव, जयेश दाभाडे, लक्ष्मण पांचाळ, गणेश बावणे, निरंजन महाराज शास्त्री,तसेच शाम पाटील आदी उपस्थित होते. या आंदोलनाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी केले होते.