ताज्या घडामोडीपुणे

विनाशाला काँग्रेस जबाबदार’, पृथ्वीराज चव्हाणांचे पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

पुणे |’सध्याची देशाची परिस्थिती लक्षात घेतली, तर लोकशाहीला धोका निर्माण झाला असून, सत्ताधारी घटनेत वारंवार बदल करून राज्यघटनाच बदलण्याचा घाट घालत आहेत. अशा वेळेला सत्ताधाऱ्यांना रोखण्याचे काम काँग्रेस आणि समविचारी पक्षांचे आहे; पण सध्या काँग्रेसलाच पक्षांतर्गत भूमिका बळकट करून आत्मचिंतन करण्याची गरज आहे. असे झाले नाही आणि येत्या काही दिवसांत काँग्रेस समविचारी पक्षांना एकत्र करू शकले नाही, तर त्यापुढे देशात जो विनाश होईल, त्याला काँग्रेसच जबाबदार असेल,’ असे सांगून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित सामाजिक क्रांती’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या सोहळ्यात चव्हाण बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, आमदार सुधीर तांबे, डॉ. विजय खरे, सचिन ईटकर आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. करमळकर कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यामुळे त्यांचा सन्मान शिंदे व चव्हाण यांनी केला.

काँग्रेसने तातडीने आत्मचिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘संपूर्ण देशात चातुवर्ण्य व्यवस्था येते, की काय, अशी भीती वाटत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक समतेवर आधारित चळवळ उभी करावी लागणार आहे. बाबासाहेबांनी विचारांची लढाई लढविली आणि त्यातून समाज क्रांती झाली. आता तरुण पिढीने चिंतन करण्याची गरज असून, विचारांचे शस्त्र घेऊन उभे राहिले पाहिजे.’

डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पुस्तकाच्या लिखाणामागचा आपला हेतू स्पष्ट केला. डॉ. करमळकर, तांबे, ईटकर यांनीही आपले विचार मांडले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.

‘बाबासाहेबांना जाति, धर्मांत बांधण्याचा प्रयत्न’

‘दुर्दैवाने हल्लीच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विशिष्ट जाती, धर्मात बांधण्याचा प्रयत्न होत आहे. सत्ताधाऱ्यांना बहुमत मिळाल्याने एक प्रकारे घटना बदलण्याचा अधिकारच त्यांना मिळाला आहे. अलीकडे असे अनेक प्रश्न सत्ताधारी करू पाहत आहेत. या सगळ्यात काँग्रेसने विचार करणे गरजेचे आहे. काँग्रेसने समविचारी पक्षांना एकत्र करणे गरजेचे असून, सत्ताधाऱ्यांना प्रबळ विरोधी पक्ष मिळाला नाही, तर त्याला काँग्रेसच जबाबदार असेल,’ असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button