६व्या टप्प्यासाठीचा प्रचार समाप्त; ५८ जागांसाठी शनिवारी मतदान
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार गुरूवारी सायंकाळी समाप्त झाला. आता त्या टप्प्यात ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ जागांसाठी शनिवारी (२५ मे) मतदान होईल. दिल्ली आणि हरियाणातील सर्व जागांचा त्यामध्ये समावेश आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील सर्व ७ जागांचा समावेश असल्याने सहाव्या टप्प्याचे महत्व वाढले आहे. त्या टप्प्यात दिल्लीप्रमाणेच हरियाणातील सर्व १० जागांसाठी मतदान होईल. त्याशिवाय, उत्तरप्रदेशातील १४, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी ८,ओडिशातील ६ आणि झारखंडमधील ४ जागा मतदान प्रक्रियेला सामोऱ्या जातील. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी या एका मतदारसंघातही मतदान होणार आहे.
हेही वाचा – दिनेश कार्तिकचा सर्वत्र बोलबाला! जाणून घ्या DK ची इन साईड आणि आऊट साईड स्टोरी
सहाव्या टप्प्यात एकूण ८८९ उमेदवारांचे भवितव्य ठरेल. प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मनेका गांधी, कॉंग्रेसचे तरूण नेते कन्हैय्या कुमार, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आदींचा समावेश आहे. त्याशिवाय, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, उद्योगपती नवीन जिंदल आणि माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय हे भाजपच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत.
लोकसभा निवडणुकीची मॅरेथॉन मतदान प्रक्रिया एकूण ७ टप्प्यांत चालणार आहे. सहाव्या टप्प्यानंतर अखेरच्या टप्प्यासाठीचे मतदान शिल्लक राहील. अखेरच्या टप्प्यासाठी १ जूनला मतदान होईल.