मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय; ३० टक्के फी कमी करण्याचे कॉलेजांना आदेश
मुंबई – कोरोनापुढे जगभरातील शेकडो देश हतबल झाले आहेत. कोरोनाचा सर्वसामान्य व्यक्तीपासून जागतिक अर्थव्यवस्थेपर्यंत सर्वच घटकांना फार मोठा फटका बसला आहे. ही कोलमडलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने मुंबईतील महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या फीमध्ये ३०% कपात करण्याची सूचना दिली आहे, तर ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशा विद्यार्थ्यांची १००% फी माफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात अनेक कंपन्यांना टाळे लागले, त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना अर्ध्या परगारावरच समाधान मानावे लागले. त्यामुळे आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे अनेक पालकांना कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती थांबू नये यासाठी महाविद्यालय आणि शाळांच्या फी कपातीसंदर्भात अनेकदा पालकांकडून मागण्या करण्यात आल्या. यावर विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुल्ककपातीची घोषणा केली होती. त्यानुसार ३० जूनला सर्व कुलगुरूंची बैठक पार पडली होती. त्यानंतर विद्यापीठांनी एक समिती स्थापन करून त्यांच्या शिफारसीनुसार शुल्ककपात निश्चित केली. आता विद्यापीठाशी संलग्न कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या शुल्कात कपात सुचवण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील अथवा दोन्ही पालकांचे निधन झाले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.