‘शरद पवारच खरे ओबीसी नेते कारण..’; बच्चू कडूंचं विधान चर्चेत
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तर, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान, यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचं विधान चांगलेच चर्चेत आहे.
बच्चू कडू म्हणाले, सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे-पाटलांची भेट घेऊन चर्चा करायला हवी होती. जरांगे-पाटलांनी आंदोलन मागे घेतलं नसते, तर सरकारला परिणाम भोगावे लागते असते. सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे.
हेही वाचा – ‘प्रभू राम आणि सीता हे केवळ हिंदुंचे नाहीत, ते सर्व हिंदूस्तानींचे आहेत’; जावेद अख्तर
दबावाचे कारण नाही. थोडीच अमेरिकेतून आणलेल्या लोकांना ओबीसीमधून आरक्षण देतोय. मराठा समाज हा देशातीलच आहे. मराठा समाजाला गृहित धरूनच ओबीसी आरक्षण देण्यात आलं होतं. काहीजण पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ओबीसी आणि मराठा समाजाचं काही देणं-घेणं नाही, असं बच्चू कडू म्हणाले.
शरद पवारांनी एका पत्रामध्ये ५२ जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला होता. खरे ओबीसी नेते शरद पवार आहेत. पण, ५२ जातींमध्ये मराठा समाजाचाही उल्लेख केला असता, तर प्रश्न मिटला असता, असंही बच्चू कडू म्हणाले.